पीओकेतील ‘शारदा पीठा’वर पाकिस्तानी लष्कराचा ताबा
बचाव समितीचा दावा : ‘नापाक’ कारवायांमुळे स्थानिकांमध्येही संताप
► वृत्तसंस्था/ श्रीनगर, बेंगळूर
पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठाच्या जमिनीवर पाकिस्तानने जबरदस्तीने कब्जा केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया सोडताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर आता शारदा बचाव समितीने (एसएससी) पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) शारदा मंदिर संकुलावर पाकिस्तानी लष्कराने कब्जा केल्याबद्दल संताप व्यक्त केला. ‘एसएससी’ने शुक्रवारी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानी लष्कराचे अतिक्रमण हटवण्यासाठी मदत मागितली. सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यास मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा होईल, असे ‘एसएससी’चे संस्थापक रविंदर पंडिता यांनी बेंगळूर येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
न्यायालयाचा आदेश असतानाही पाकिस्तानी लष्कराने शारदा मंदिर परिसर ताब्यात घेत तेथे ‘कॉफी हाऊस’ बांधल्याचा आरोप शारदा बचाव समितीने केला. शारदा बचाव समितीने पाकिस्तानी लष्कराने शारदा पीठ संकुलात नुकतेच बांधलेले कॉफी हाऊस हटवण्याचा आणि त्यावर कब्जा करण्याचा मुद्दा भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित करण्याची विनंती केली. 3 जानेवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने शारदा बचाव समितीच्या बाजूने निकाल दिलेला असतानाही पाकिस्तानी लष्कराने केलेले हे कृत्य अयोग्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शारदा पीठाला युनेस्को हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्याची मागणीही केली.
पीओकेमधील स्थानिक लोकांनीही या समस्येबद्दल आणि सीमा भिंतींच्या केलेल्या नुकसानीबाबत आवाज उठवला आहे. भाविकांना यात्रेला जाण्यासाठी शारदा पीठ पुन्हा खुले करावे, अशी मागणी रविंदर पंडिता यांनी केली. पाकिस्तानने कॉफी होम न हटवल्यास आम्ही नियंत्रण रेषेकडे (एलओसी) कूच करू आणि ते ओलांडू, असा इशाराही त्यांनी दिला. या मोर्चासाठी सर्व शारदा समर्थकांना सज्ज राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.