अत्याचारांसाठी पाकिस्तानच जबाबदार
पीओकेसंदर्भात भारताने केला आरोप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सेनेकडून अनन्वित अत्याचार केले जात असून तेथील हिंसाचाराला पाकिस्तानच जबाबदार आहे, असा आरोप भारताने केला आहे. विश्वसमुदायाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चाललेल्या या अत्याचारांन थांबविण्याचे काम केले पाहिजे आणि पाकिस्तानला या दमनकृत्यासाठी उत्तरदायी धरुन पाकिस्तावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे आवाहन भारताने केले आहे.
पाकिस्ताव्याप्त काश्मीरची जनता तिच्या न्याय्य अधिकारांसाठी संघर्ष करीत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या संघर्षाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन तो थांबविला पाहिजे. पाकिस्तानने ज्या ‘मुजाहिद्दिन’ला प्रशिक्षण, पैसा, शस्त्रास्त्रे आणि इतर साहाय्य देऊन भारताविरोधात दहशतवाद भडविण्याची प्रेरणा दिली, तीच मुजाहिद्दिन आज पाकिस्ताच्या जनतेवर उलटली आहे.
पाकिस्ताव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सेनेने क्रौर्याच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने याची त्वरित नोंद घेऊन पाकिस्तानला समज द्यावी. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रववक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.