26 दहशतवाद्यांचा मृत्यू, पाकिस्तानची कबुली
भारताला दिली प्रत्युत्तराची धमकी : जीवितहानीचा आकडा दाखविला कमी
भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचे पाकिस्तानच्या सैन्याने मान्य केले आहे. भारताच्या कारवाईत 26 दहशतवादी मारले गेल्याचा तर 46 जखमी झाल्याचा दावा पाकिस्तान सैन्याने केला आहे. भारताने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत हा हल्ला केला आहे. अशास्थितीत पाकिस्तान प्रत्युत्तर देणार आहे. भारताने युद्धाची कारवाई केली असून पाक सैन्य स्वत:च्या हिशेबानुसार स्वत: ठरविलेल्या वेळेत भारताला याचे प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हणत पाकिस्ताने उसने अवसान आणले आहे.
पाकिस्तान पूर्ण मजबुतीने भारताच्या आक्रमकतेला पूर्णपणे प्रत्युत्तर देत असून पुढेही देत राहणार आहे. भारताला पाकिस्तानच्या सैन्य शक्तीवरून काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. पाकिस्तान सैन्य कधीच मृत्यूला घाबरत नाही आम्ही कठोर प्रत्युत्तर देऊ असे उद्गार पाकिस्तानचे डीजी आयएसपीआर जनरल अहमद चौधरी यांनी काढले आहेत.
विमानांनी ओलांडली नाही सीमा
भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात किंवा पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय क्षेत्रात प्रवेश केलेला नाही. कुठल्याही भारतीय विमानाला पाकिस्तानच्या हवाईक्षेत्रात शिरू देण्यात आलेले नाही. पाकिस्तानचे कुठलेही लढाऊ विमान भारतीय क्षेत्रात दाखल झाले नाही. भारताने स्वत:च्या सीमेतूनच पाकिस्तानी भूमीवर क्षेपणास्त्रs डागली असल्याचे जनरल चौधरी यांनी स्पष्ट केले.
भारताला प्रत्युत्तर देऊ : शाहबाज
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही युद्धाच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार सुरक्षित ठेवत आहोत असा दावा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची घाबरगुंडी
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेत केलेल्या स्ट्राइकनंतर पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कूटनीतिक अॅक्शन घेण्यात आल्यापासून पाकिस्तानचे अनेक नेते दर्पोक्ती करत होते, परंतु आता शेजारी देशात शांतता पसरली आहे. भारताच्या या सैन्य कारवाईनंतर पाकिस्तान युद्ध छेडणार असल्याचे मानले जात होते, परंतु पाकिस्तानने आता युद्ध सुरू होण्यापूर्वीच युद्धविरामाची घोषणा केली आहे.
आम्ही आमचे रक्षण करू. जर भारत आणखी कुठली कारवाई करणार नसेल तर आम्हीही काहीच करणार नाही अशी भूमिका पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मांडली आहे. त्यापूर्वी त्यांनी भारताला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे वक्तव्य केले होते. परंतु काही तासांतच त्यांनी घुमजाव करत पाकिस्तानची भीती दाखवून दिली आहे.