Konkan Tourist: जेवण, घोड्यांसाठी थांबलो नसतो तर..., चौगुले दांपत्याने सांगितला थरारक अनुभव
सर्वजण घोड्यावर स्वार झाल्यावर तेथील एका स्थानिकाने त्यांना ‘पुढे फायरिंग झालेले आहे. जाऊ नका’ असे सांगितले
By : मनोज पवार
दापोली : बैसलर खोऱ्यात जिथे घटना घडली तेथे जाण्याकरिता घोड्यावरून जावे लागते. याकरिता टूर गाईडने 15 घोड्यांची व्यवस्था केली. मात्र सर्वांना घोडे मिळाल्याशिवाय तेथून जायचं नाही. गेलो तर एकत्रच असा सूर आम्ही सर्वांनी आळवला. त्यामुळे घोड्यांची जमवाजमव करण्यात पंधरा मिनिटे गेली. सर्वजण घोड्यावर स्वार झाल्यावर तेथील एका स्थानिकाने ‘पुढे फायरिंग झालेले आहे जाऊ नका’ असे आवाहन केले. त्यामुळे घोड्यांसाठी थांबलो म्हणूनच आम्ही वाचलो, असा थरारक अनुभव पहलगाम येथून सुखरुप दापोलीत परतलेल्या शिवप्रसाद चौगुले व प्रियंका चौगुले यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना कथन केला.
जम्मू-काश्मीर येथे येथील पहलगाम जवळील बैसलर खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यात 27 जण मारले गेले. यामध्ये महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश आहे. दापोली तालुक्यातील जालगाव येथील रहिवासी व विद्यापीठातील सहाय्यक निवृत्त अभियंता शिवप्रसाद चौगुले व प्रियंका चौगुले हदेखील काश्मीरला गेले होते. 17 तारखेला काश्मीरला पोहोचल्यावर त्यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या.
जेवण आधी केले अन् घोड्यासाठी थांबलो
ज्यादिवशी हल्ल्याची घटना घडली त्यादिवशी ते दीड वाजता पहलगामला पोहोचले. त्यांचा ग्रुप सर्वसाधारणपणे पॉईंट्स पाहून झाल्यानंतर जेवण करत असे. मात्र त्यादिवशी त्यांनी पहलगामला पोहोचल्यावर शंकराचे दर्शन घेतले आणि नंतर पॉईंट्स पाहण्याच्या आधी जेवणाचा निर्णय घेतला. जेवणासाठी त्यांना अर्धा तास लागला. शिवाय जिथे घटना घडली तेथे जाण्याकरिता घोड्यावरून जावे लागते. याकरिता त्यांच्या टूर गाईडने 15 घोड्यांची व्यवस्था केली होती. मात्र सर्वांना घोडे मिळाल्याशिवाय तेथून जायचं नाही.
गेलो तर एकत्र जाऊ असा सूर सर्वांनी आळवला. त्यामुळे घोड्यांची जमवाजमव करण्यात आणखी पंधरा मिनिटे गेली. सर्वजण घोड्यावर स्वार झाल्यावर तेथील एका स्थानिकाने त्यांना ‘पुढे फायरिंग झालेले आहे. जाऊ नका’ असे सांगितले. यानंतर त्यांच्या टूर गाईडने तत्काळ सर्वांचे घोडे वळवले व सर्वांना घोड्यावरुन खाली उतरवले. तोपर्यंत त्यांना घटनेचे गांभीर्य कळलेले नव्हते.
फायरिंग झाल्याचे ऐकल्यावर भीतीने ग्रासले
चौगुले म्हणाले, फायरिंग झाल्याचे ऐकल्यावर सर्वांना भीतीने ग्रासले. मग सर्वांनी जवळच असणारी अऊ व्हॅली पाहण्याचा निर्णय घेतला. ती पाहून आल्यावर त्यांना भारतीय सैन्य दलाची हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालताना दिसली. ती हेलिकॉप्टर्स दहशतवाद्यांचा शोध घेत होती. त्यावेळी त्यांना घटनेचे गांभीर्य कळले. सदर घटनास्थळापासून हा ग्रुप केवळ दोन किलोमीटर मागे होता. जर जेवण आणि घोडे मिळवण्यामध्ये वेळ गेला नसता तर आज चित्र काही वेगळेच दिसले असते, असे त्यांनी सांगितले.
श्रीनगरला जाण्यासाठी एकच गर्दी
यानंतर त्यांच्या ग्रुपने पहलगामला न थांबता श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ग्रुपमध्ये दोन वयस्कर नागरिक व दोन मुलेदेखील होती. पहलगामवरून श्रीनगरला जाण्याकरिता सर्वच पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी त्यांना स्थानिक नागरिक, प्रशासन, भारतीय लष्कर, स्थानिक सामाजिक संस्था यांनी खूप सहकार्य केले. विमानतळाच्या बाहेर सर्वांकरिता तंबूची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये चहा, पाणी, जेवण आदींची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर सर्वजण श्रीनगरवरून चंदीगडला आले, चंदीगडवरून पुणे व पुण्यावरुन दापोलीला सुखरुप पोहोचले.
स्थानिकांचे खूप सहकार्य
पर्यटन हाच तिकडचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे सदर घटना घडल्यावर तेथील स्थानिक मुस्लिम कमालीचे नाराज झाले होते. त्यांनीच आपली विमानतळापर्यंत पोहोचण्याची चोख व्यवस्था केली. आम्हाला खाणं, पाणी, चहा, केळी आदी गोष्टी पुरवल्या. मात्र यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू लपत नव्हते असेदेखील चौगुले दांपत्याने सांगितले.