हजाराहून अधिक निरुपयोगी कायदे रद्द
वृत्तसंस्था / उज्जैन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या काळात 1 हजार 550 कालबाह्या कायदे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली आहे. त्यांनी मध्यप्रदेशातील या शहरात आयोजित एका औद्योगिक कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कायदा व्यवस्थेवरचे अनावश्यक ओझे कमी झाले आहे. हे कायदा विनाकारण तसेच राखून ठेवण्यात आले होते. वास्तविक ते यापूर्वीच रद्द करावयास हवे होते. पण पूर्वीच्या सरकारांनी त्याकडे लक्ष न दिल्याने ते तसेच राहिले होते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
रद्द करण्यात आलेल्या कायद्यांपैकी अनेक कायदे उद्योग आणि उद्योजक यांच्यासाठी हानीकारक होते. तसेच त्यांच्या अस्तित्वामुळे उद्योगांच्या विकासाला अडथळा येत होता. त्या कायद्यांचा काहीही उपयोग नव्हता. तरीही ते कायदा व्यवस्थेच्या गळ्यातील लोढणे बनून राहिले होते. ते दूर केल्याने आता कायदा व्यवस्था मोकळा श्वास घेऊ लागली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.