गांधीनगर येथे कचरा पेटवून दिल्याने संताप
बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गुरुवारी गांधीनगरजवळ कचरा पेटवून देण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कचरा पेटवून दिल्यामुळे पर्यावरण दूषित होत आहे. अशा तक्रारी आता होत आहेत. महानगरपालिकेच्यावतीने कचऱ्याची उचल करणे, त्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे, असे पर्यावरण साहाय्यक अभियंता हणमंत कलादगी हे वारंवार सांगत आहेत. मात्र, शहरात अनेक ठिकाणचा कचरा पेटवून देण्यात येत आहे. जर विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवारी होत असेल तर कचरा पेटवून देण्यामागचे नेमके कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गांधीनगर येथे कचऱ्याचा मोठा ढीग पेटवून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र धुराचे लोळ पसरले होते. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून उदबत्ती प्रकल्प तसेच इतर प्रकल्प राबविण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रकल्प सुरू आहेत की नाही? हे देखील आता पहावे लागणार आहे. एकूणच या प्रकारामुळे महानगरपालिका साऱ्यांचीच दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील होत आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी याकडे लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.