‘आमचा गाव आमचा तलाव’ योजना कागदावरच
वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई : तलाव निर्मितीची गरज
बेळगाव : वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागातही पाणी समस्या गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे. त्यामुळे ‘आमचा गाव आमचा तलाव’ या योजनेची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. मात्र अंमलबजावणीविना बहुतांशी ग्रामीण भागात ही योजना राबविली गेली नाही. त्यामुळे कडक उन्हाळ्यात या योजनेची साऱ्यांनाच आठवण होऊ लागली आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. मानवाबरोबर जनावरांचेही पाण्यासाठी हाल होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत ‘आमचा गाव आमचा तलाव’ ही योजना उत्तम ठरली असती. मात्र प्रत्यक्षात योजना राबविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात या योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या तलावांचा पुरेपूर वापर झाला असता. मात्र ही योजना कागदावरच राहिल्याने पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गावात तलावाची खोदाई करून पाण्याचा जलस्त्रोत निर्माण करणे हा उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात गावोगावी या योजनेची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांना पाण्यापासून दूर रहावे लागले. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी व शासनाने ही योजना राबवून तलावाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागात तलावांअभावी पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जनावरांनाही पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. प्रत्येक गावात तलाव निर्मितीसाठी ही योजना राबविण्यात आली होती. मात्र बहुतांशी गावात ही योजना प्रत्यक्षात राबविण्यात आली नाही. अद्यापही काही गावांमध्ये तलाव नाही. त्यामुळे ग्रामस्थांबरोबरच जनावरांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे अशा महत्त्वाकांक्षी योजनांची मागणी होऊ लागली आहे.