अन्यथा उद्भवणाऱ्या जनक्षोभाला पालिका प्रशासन जबाबदार राहील : प्रा. सिद्धेश नेरुरकर
गॅस , पाणी पाईपलाईनच्या नियोजनशून्य कामाचा सर्वोदयनगर कॉलनीला फटका
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी सर्वोदयनगर कॉलनीत गेल्या महिनाभरापासून नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन तसेच पाणीपुरवठा लाईन टाकण्याच्या कामाबाबत तेथील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर गॅस पाईपलाईन आणि पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीमुळे परिसरात प्रचंड धूळ ,घाण आणि अस्वच्छता पसरलेली आहे. सदर काम सुरु असताना नगरपरिषदेच्या टाऊन प्लॅनिंग विभागातील एकही जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे असा आरोप करीत जर येत्या दोन दिवसांत हे काम तात्काळ थांबवून योग्य पद्धतीने, आवश्यक खबरदारी व प्रशासनाच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आले नाही, तर सर्वोदय नगरमधील नागरिक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहेत. आज होईल, उद्या होईल” अशा खोट्या आश्वासनांमुळे संपूर्ण परिसर धुळीत माखलेला असून वेळीच कार्यवाही केली तर ठीक अन्यथा उद्भवणाऱ्या जनक्षोभाला प्रशासन स्वतः जबाबदार राहील, असा इशारा प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे. सदर काम सुरु होण्यापूर्वी येथील रहिवासी सुरक्षित जीवन जगत होते. मात्र , पाईपलाईन टाकण्याच्या कामास सुरुवात झाल्यापासून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू झाला आहे अशीही श्री नेरुरकर यांची तक्रार आहे . गेल्या महिनाभरात या परिसरातील अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास, आमांश (डिसेन्ट्री), उलट्या व इतर आजारांना सामोरे जावे लागले आहे. याला नियोजनशून्य व बेजबाबदार काम कारणीभूत आहे.त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही करून सर्वोदयनगर कॉलनी परिसराला धूळमुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे .