Sangli Politics : ... अन्यथा शिवसेना स्वबळावर लढणार ; मंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन
महायुतीसाठी भाजपसोबत प्राथमिक चर्चा सुरू
सांगली : सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच महायुती म्हणून निवडणूक लढवली जाईल. अन्यथा शिवसेना स्वबळावर मैदानात उतरेल, अशी ठाम भूमिका शिवसेना संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी मांडली.त्यांनी महापालिकेसाठी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक व संवाद मेळावा घेतला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
देसाई म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी महायुती व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपसोबत प्राथमिक चर्चा झाली असून पालकमंत्र्यांशीही चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत बैठक होणार आहे. मात्र जागावाटपातशिवसेनेला मान-सन्मान दिला गेला तरच महायुती शक्य आहे. पुढील चर्चेची जबाबदारी आमदार सुहास बाबर यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेकडे तब्बल १७५ इच्छुक उमेदवार असून प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महायुती झाली नाही, तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्यास पूर्णपणे तयार आहे, असे देसाई यांनीस्पष्ट केले. इच्छुक उमेदवारांना पक्षाचे काम वाढवण्याच्या, चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही दिल्या.
महापालिकेच्या विकासाबाबत बोलताना देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत योजनेतून २६६ कोटी आणि मूलभूत सोयी-सुविधांसाठी १६६ कोटी असा एकूण ४३२ कोटींचा निधी दिला आहे. अलीकडेच तीन कोटींचा अतिरिक्त निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले, ते केंद्रात मंत्री असताना घडलेल्या एखाद्या घटनेचा उल्लेख करत असतील. मात्र सध्याचे ऑपरेशन सिंदूर संपूर्ण देशाला माहिती असून त्यात पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला आहे.
शिवसेनेला जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने शिवसेनेला सन्मान दिला नाही, तर त्याचा फटका महायुतीलाच बसेल, असा इशाराही त्यांनी दिला. संवाद मेळाव्यावेळी सुहास बाबर, चंद्रहार पाटील, मोहन बनखंडे, बजरंग पाटील, महेंद्र चंडाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.