..अन्यथा गाझा अन् पॅलेस्टाइनसारखी स्थिती होईल!
जम्मू-काश्मीरसंबंधी फारुख अब्दुल्लांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि त्याविरोधातील सैन्याच्या कारवाईवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी मोठे वक्तव्य केले आहे. चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, अन्यथा आमची स्थिती देखील गाझा आणि पॅलेस्टाइनसारखी होऊ शकते असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन झालेले नाही. पूर्वीच्या तुलनेत याचे प्रमाण उलट अधिक आहे. सध्या द्वेषाचे प्रमाण वाढल्याने मुस्लीम आणि हिंदूंना आपण परस्परांचे शत्रू आहोत, असे वाटतेय. पाकिस्तानात नवाज शरीफ हे पंतप्रधान होणार आहेत. शरीफ हे चर्चेसाठी तयार आहेत. मग भारताने या चर्चेला होकार दर्शविण्यात काय गैर असे अब्दुल्ला यांचे म्हणणे आहे.
मित्र बदलले जाऊ शकतात, शेजारी बदलता येत नाहीत, या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वक्तव्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. शेजाऱ्यांशी मैत्री राहिल्यास दोघेही प्रगती करतील, तर शत्रुत्वात राहिल्यास दोघांचीही प्रगती खुंटणार आहे. युद्ध आजच्या काळात पर्याय नसल्याचे स्वत: मोदींनीच म्हटले आहे. चर्चेतूनच समस्येवर तोडगा निघू शकतो. नवाज शरीफ हे पंतप्रधान होणार आहेत, ते द्विपक्षीय चर्चेबद्दल सकारात्मक आहेत, असे अब्दुल्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्dयात गुरुवारी दहशतवाद्यांनी सैन्याच्या वाहनावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 4 सैनिक हुतात्मा झाले होते. तर तीन सैनिक जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत काही दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते.