...अन्यथा शेतकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार
राष्ट्रीय रयत संघाचे नेते प्रकाश नाईक यांचा इशारा
बेळगाव : शेतकरी संघटनेच्या सहकारी संस्थेचे जतन करण्याच्या प्रक्रियेला विरोध केल्यास शेतकरी संघटना बेळगाव, खानापूर, कित्तूर व हुक्केरी आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन शेतकऱ्यांचे हित जपण्याचे प्रयत्न करण्यात येतील. तसेच पीकेपीएस सदस्यांनी त्याला विरोध केल्यास आगामी पीकेपीएस निवडणुकीत शेतकऱ्यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढविली जाईल. मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा आदर करून निवडणुकीतून माघार घ्यावी. असे न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा राष्ट्रीय रयत संघाचे प्रकाश नाईक यांनी दिला.
कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांमुळेच सुदृढ बनते. सहकार क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त व्हावे, ही शेतकऱ्यांची भावना असून शेतकऱ्यांना व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्राने कार्य करावे, मात्र राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी सहकारी क्षेत्रांचा वापर करत आहेत. यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रापासून दूर राहून आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून अलिप्त रहावे.
डीसीसी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवर नजर टाकल्यास खानापूर व हुक्केरी भागातील प्रत्येक पीकेपीएसमध्ये 25 ते 50 लाख रुपयांपर्यंत घोडेबाजार करण्यात आला आहे. विविध पीकेपीएसमध्ये संचालक मंडळांकडून गैरव्यवहार करण्यात आला असून संचालक मंडळात बँक कर्मचाऱ्यांचा समावेश करून मनमानीप्रमाणे कामकाज करण्यात येत आहे. हे रोखण्यासाठी डीसीसी बँक निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबरोबरच शेतकरी सहकारी बँकेच्या आरबीआयच्या विशेष प्रणाली अंतर्गत समावेश करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी किशन नंदी, रविंद्र सुप्पण्णवर, महांतेश कमते, बसवराज मोकाशी, संजयकुमार, सुरेश वाली आदी उपस्थित होते.