खानापुरात 13 रोजी लोकअदालतीचे आयोजन
प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
खानापूर : राष्ट्रीय लोकअदालतीच्या सूचनेप्रमाणे दि. 13 जुलैपर्यंत खानापूर न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन केले आहे. या लोकअदालतीत तालुक्यातील को-ऑप. सोसायटीच्यावतीने दाखल केलेले कर्जवसुलीचे दावे समेट करून निकालात काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खानापूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश वीरेश हिरेमठ यांनी पतसंस्थेच्या प्रतिनिधींच्या बोलावलेल्या बैठकीत केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी होते. बैठकीला खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, तालुक्यातील पतसंस्था तसेच को-ऑप. बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संघटनेचे सेक्रेटरी मारुती कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. न्यायाधीश वीरेश हिरेमठ म्हणाले, पोलिसांनी न्यायालयाकडून आलेले वॉरंट व नोटीस वेळेवर संबंधितांना पोहचविणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला. वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी म्हणाले, तालुक्यातील पतसंस्थेच्या पदाधिकारी आणि व्यवस्थापकांनी प्रलंबित वसुलीचे खटले निकालात काढण्यासाठी सहकार्य करावे. बैठकीला नंदगड पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील तसेच वकील संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि संचालक उपस्थित होते.