विरोधी पक्षांकडून पंतप्रधान मोदींचा द्वेष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी तेजस युद्ध विमानातून झेप घेतली आहे. त्यांच्या या विमान प्रवासावर विरोधी पक्षांनी काहूर उठविले होते. पंतप्रधान मोदींचा हा केवळ निवडणूक स्टंट आहे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते. भारतीय जनता पक्षाने विरोधकांच्या या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विमानात बसले होते, ते विमान लवकरच पडणार आहे, अशी आपल्याला खात्री आहे, अशी शेलकी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केली होती. भारतीय जनता पक्षाकडून सेन यांच्यावरही पलटवार करण्यात आला. विरोधी पक्ष त्यांच्या भवितव्याविषयी साशंक असल्याने अत्यंत सैरभैर झाले आहेत. परिणामी त्यांच्या नेत्यांचा स्वत:वरचा तोल सुटला असून पंतप्रधान मोदी यांच्या संबंधी ते बेताल आणि निर्लज्ज वक्तव्ये करीत आहेत. पंतप्रधान मोदींचा व्यक्तीगत द्वेष करणे, हेच काम आता विरोधकांना उरले आहे. आज जग संपूर्ण भारताच्या सामर्थ्याला मान देत असताना विरोधकांनी अशी टीका करावी, यावरुन विरोधकांनी देशाच्या राजकारणाची पातळी किती खालच्या स्तरावर नेली आहे, याची प्रचीती त्यांच्या टीकेतून येते, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
जनतेचे आशीर्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताच्या जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे विरोधकांची द्वेषयुक्त टीका त्यांचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. विरोधकांना त्यांची योग्य जागा जनताच तिला संधी मिळताच दाखवून देईल. पंतप्रधान मोदी देशाची प्रगती करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पण विरोधकांना भारताचे संरक्षण सामर्थ्य वाढावे असे वाटतच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.