For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेरणास्थळावर विरोधकांचा आक्षेप

06:43 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रेरणास्थळावर विरोधकांचा आक्षेप
Advertisement

संसद भवन परिसरातील पुतळे हलविण्यास विरोध

Advertisement

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली

संसद परिसरातील स्वातंत्र्यसेनानींचे पुतळे हलविण्याच्या मुद्द्यावरून सध्या सरकार आणि विरोधी पक्षांदरम्यान वाक्युद्ध सुरू आहे. सरकारने जाणूनबुजून पुतळे एका बाजूला हलविले आहेत, जेणेकरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी वेळोवेळी एकजूट होत निदर्शन करू नयेत असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर या आरोपाप्रकरणी सरकारनेही भूमिका स्पष्ट केली आहे. पुतळे हटविण्यात आले असून हलविण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी सर्व पुतळे बसविण्यात आल्याने महान व्यक्तिमत्त्वांविषयी जाणून घेण्यास लोकाना मदत होईल असे स्पष्टीकरण लोकसभा अध्यक्षांकडून देण्यात आले.

Advertisement

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा संसद परिसरातील प्रमुख स्थानांवर होता, तेथेच विरोधी पक्षांचे खासदार सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठी एकत्र यायचे. पुतळे हटविण्याचे मुख्य कारण महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचा पुतळा संसद भवनाच्या बरोबर समोर एखाद्या प्रमुख स्थानी नसावा हे आहे. खासदारांना प्रसंगी शांततापूर्ण आणि लोकशाहीच्या मार्गाने निदर्शने करता येऊ नयेत असा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

सर्व पुतळ्यांना प्रेरणास्थळामध्ये हलविण्यात आले आहे. जुने संसद भवन आणि संसद पुस्तकालय भवनादरम्याच्या लॉनमध्ये हे प्रेरणास्थळ निर्माण करण्यात आले आहे. हे प्रेरणास्थळ वर्षभर अतिथींसाठी खुले राहणार आहे. हे पाहण्यासाठी येणारे लोक राष्ट्रउभारणीत योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल जाणून घेऊ शकतील. महान भारतीयांच्या जीवनगाथा आणि संदेशांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अतिथीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले आहे. संसद परिसराच्या बाहेरील लॉनमध्ये डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, हेमू कलानी, महात्मा बसवेश्वर, कित्तूर राणी चन्नम्मा, मोतीलाल नेहरू, महाराज रणजीत सिंहृ दुर्गा मल्ल, बिरसा मुंडा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि चौधरी देवी लाल यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचे पुतळे आहेत.

बदल का करण्यात आला?

नव्या संसद भवनाच्या निर्मितीकार्यादरम्यान महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू आणि चौधरी देवीलाल यांच्या पुतळ्यांना परिसराच्या आत अन्य ठिकाणी हलविण्यात आले. प्रेरणास्थळावर पुतळ्यांच्या चहुबाजूला उद्यान निर्माण करण्यात आले आहे. तसेच क्यूआर कोडचा वापर करून लोकांना त्यांच्याविषयी माहिती मिळविता येणार असल्याचे बिर्ला यांचे सांगणे आहे.

कुठलाही पुतळा हटविण्यात आलेला नाही, तर केवळ दुसरीकडे हलविण्यात आला आहे. यावर राजकारण करण्याची गरज नाही. संबंधित घटकांशी मी या मुद्द्यांवर वेळावेळी चर्चा करत राहिलो आहे. हे पुतळे एकाच ठिकाणी बसविण्यात आल्याने त्यांचे जीवन आणि कामगिरीविषयी अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यास मदत होणार असल्याचे लोकांचे मानणे आहे असे बिर्ला यांनी म्हटले आहे.

प्रेरणास्थळाचे उद्घाटन

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, अश्विनी वैष्णव, अर्जुन राम मेघवाल, एल मुरुगन यांच्या उपस्थितीत प्रेरणास्थळाचे उद्घाटन केले. या सोहळ्यात लोकसभा खासदार जगदंबिका पाल आणि राज्यसभा खासदार राकेश सिन्हा देखील उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.