...तरच ऑलिम्पिकमधील पदकांची संख्या वाढेल!
शालेय स्तरावर शारीरिक शिक्षणास प्रोत्साहन देण्याची गरज, शिक्षकांनी व्यक्त केल्या भावना
सुकृत मोकाशी / पुणे
आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची संख्या वाढवायची असेल, तर शालेय स्तरावरच शारीरिक शिक्षणास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यातूनच भविष्यातील खेळाडू घडू शकतात आणि तेच पुढे ऑलिम्पिकपर्यंत मजल मारू शकतात, असे मत शाळेत शारिरीक शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी येथे व्यक्त केले.
पॅरिस येथे नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. यात 41 पदकांवर देशाला समाधान मानावे लागले. यात एकाही गोल्ड मेडलचा समावेश नाही. त्यामुळे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील क्रीडा स्थितीवर टीका होत असून, आता यावर मंथन सुरू आहे. याबाबत ‘तऊण भारत’शी बोलताना सेंट मीरा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आणि शारिरीक शिक्षण शिक्षिका सुवर्णा देवळाणकर म्हणाल्या, एकीकडे खेळाडूंनी पदके जिंकल्यावर आपण त्यांचा गौरव करतो, त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव करतो, पण शालेय स्तरापासून खेळाडू घडविण्यासाठी मूलभूत अशा कोणत्या गोष्टी त्यांना आपण देतो का? आपल्याकडे मुलांना ना खेळण्यासाठी मैदाने आहेत, ना ते शिकविणारे शिक्षक. शिक्षक असले तरी ते पुरेसे नाहीत. अनेक शिक्षक हे आपल्या परीने मुलांना शारीरिक शिक्षणाचे, खेळांचे धडे देत असतात. मात्र, हे प्रयत्न अपुरे आहेत. मुलांचे आरोग्य, त्यांचा आहार, त्यांनी करावयाचे व्यायाम याबद्दल शाळाच सजग नसतील, तर मुलांना या गोष्टींचा लाभ होणार कसा? शारीरिकदृष्ट्या मुले तंदुऊस्त असतील, तर ती मानसिकदृष्ट्याही तंदुऊस्त होऊ शकतील, हा विचार करायला हवा. त्यासाठी शाळांत होणाऱ्या कवायती, लेझीम यांचे खूप मोठे योगदान आहे. विशेषत: लेझीमसारखा खेळ तर शरीराला सर्वांगीण व्यायाम देणारा आहे.
बहुतेक सर्व खेळाडूंचा खेळाडू म्हणून कारकिर्दीचा पाया हा शाळेतील शारीरिक शिक्षकांद्वारे उभारला जात असतो. ते काम शिक्षक प्रामाणिकपणे करत असतात. शालेय स्तरावरील खेळांचा, विविध स्पर्धेत खेळाडूंना तयार करणे, स्पर्धेला पाठवणे, विद्यार्थ्यास आरोग्य विषयक शिक्षण देणे,त्यांना लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची गोडी लावणे, संतुलित आहाराची गरज आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करणे इत्यादी अनेक गोष्टी शारीरिक शिक्षण शिक्षक करत असतो. बी.पी.एड चे शिक्षण घेत असताना विविध खेळांचे ज्ञान मिळवण्याबरोबरच क्रीडा मानसशास्त्रासारख्या विविध विषयांचा अभ्यास केलेला असतो. मात्र, या शिक्षकाची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. आडात नाही तर मग पोहऱ्यात कसे येणार, अशी अवस्था आहे., असेही देवळाणकर यांनी यावेळी नमूद केले.
श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुरासे विद्यालयातील अतुल पवार म्हणाले, ग्रामीण भागात मैदाने आहेत. पण, शाळेत मैदाने नाहीत. आंतरशालेय स्पर्धा या दुसरीकडे जाऊन घ्याव्या लागतात. अनेकवेळा खेळांचे साहित्य उपलब्ध नसते. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या, सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या कोट्यावधी मुलांकडे जोपर्यंत दर्जेदार क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षण पोहोचत नाही, मुलांच्या तुलनेत क्रीडा शिक्षकांची संख्या वाढवत नाही, मैदानाची संख्या वाढत तोपर्यंत ऑलिंपिकमधला पदकांचा दुष्काळ सुरूच राहणार.
शाळेत शारिरीक शिक्षणासाठी ग्रेड दिली जाते. ग्रेड न देता त्याला मार्क्स दिले तर त्याविषयी गांभीर्य निर्माण होईल. शारिरीक शिक्षणाचे तास कमी केले आहेत. ते वाढविले पाहिजेत. त्या तासांचा उपयोग हा दुसरे तास घेण्यासाठी केला जातो. शारिरीक शिक्षण हा टिचिंगचा विषय झाला पाहिजे. त्यावेळेस मुले फक्त मैदानावर पाहिजेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.