लाखात एखाद्यालाच गणेशतत्व समजते
अध्याय सहावा
बाप्पा म्हणाले, माणसाला ईश्वराने आचार आणि विचार स्वातंत्र्य दिलेले आहे त्यानुसार जो स्वकर्म कुसुमांनी ईश्वराचे पूजन करेल त्याच्या पदरी खूप मोठा पुण्यसाठा जमतो. अर्थात स्वधर्म पालन करणारा लाखात एखादाच असल्याने लाखात एखाद्यालाच अशी इच्छा होते. त्याला ईश्वर स्वत:हून मार्ग दाखवतात. ज्यांना अशी इच्छा होते तो लाखात एखादाच असतो हे वर सांगितलेलेच आहे परंतु त्यातील म्हणजे अशा लाखातील एखाद्यालाच ईश्वरी तत्व जाणता येते. एखाद्याला ईश्वरी तत्व जाणून घ्यावे, त्यादिशेने प्रयत्न करावेत असे वाटले तर त्याला ते समजून घेणे किती असाध्य आहे हे समजण्यासाठी सांगितले नसून ईश्वरीतत्व जाणून घेण्यासाठी किती दक्षता घ्यावी लागते हे समजण्यासाठी सांगितले आहे. कारण अशा मार्गावर चालत असताना, कधीतरी स्वधर्माचे आचरण करत असताना तो अकर्म करू लागतो. त्यामुळे त्याला स्वकर्म करण्याचे भान रहात नाही किंवा मध्येच त्याला विषयसुखाची ओढ वाटू लागते आणि त्यापायी तो ईश्वराने दाखवलेला मार्ग सोडून पुन्हा क्षणिक मोहाच्या गोष्टीत अडकतो. म्हणून बाप्पा पुढील श्लोकात म्हणतात की, नुसतं ईश्वराने दाखवलेल्या मार्गावरून चालायला लागेल त्याला ईश्वरीतत्व म्हणजे काय ते समजेलच असं नाही.
साक्षात्करोति मां कश्चिद्यत्नवत्स्वपि तेषु च ।
मत्तोऽन्यन्नेक्षते किंचिन्मयि सर्वं च वीक्षते ।। 8 ।।
अर्थ- गणेशतत्व जाणून घ्यावे म्हणून यत्न करणाऱ्यांपैकी एखाद्यालाच माझा साक्षात्कार होतो. तो माझ्याहून वेगळे काही आहे असे पहात नाही. सर्व माझ्या ठिकाणी आहे असे तो पाहतो.
विवरण-लाखात एखादा ईश्वरी तत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतो आणि अशा लाखातल्या एखाद्यालाच ईश्वरी तत्व समजते अशा अर्थाचा श्लोक भगवद्गीतेतही आहे. भगवंत म्हणतात, लक्षावधींत एखादा मोक्षार्थ झटतो कधी । झटणाऱ्यात एखादा तत्त्वता जाणतो मज ।। 7.3।।. ह्यामागे दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे बाप्पांनी नेमून दिलेलं कर्म करत असताना कधी कधी ते आपल्या हातून अधिक व्हावं, जलद व्हावं अशा इच्छेने ते कर्म करण्यासाठी त्याला झालेल्या प्रेरणेशिवाय वेगळ्या पद्धतीने करावं असं माणसाला वाटू लागतं, ह्यात त्याचा हेतू चांगला असला तरी ईश्वराला शरण जाताना त्याने मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केलेली असते पण त्याच्या मनात करत आलेल्या कर्माबद्दल निरनिराळे विचार आल्याने त्याला झालेल्या दैवी प्रेरणेच्या पलीकडे त्याने काही करावयाचे आहे ह्याचा विसर पडतो आणि त्यातूनच त्याच्या हातून अकर्म घडू लागते. म्हणून विहित कर्म करत असताना आपल्या हातून अकर्म घडत नाही ना ह्याबद्दल माणसाने सदैव जागृत असायला हवं. चुकून घडू लागलं तर सावध होऊन पुन्हा मूळ मार्गावर येऊन कर्म करू लागावं. माणसाच्या हातून चुका होत असतात. त्या दुरुस्त करत पुढे जाणारा साधक परिपूर्ण होतो हे बाप्पा जाणून आहेत. म्हणून परिपूर्ण होण्यासाठी सावधानतेने कर्म करणारे साधक बाप्पांचे लाडके होतात. लाखात एखाद्यालाच गणेशतत्व समजण्याचे आणखी एक कारण म्हणजे स्वधर्माचे आचरण करत असताना त्याला अचानक समोर दिसणाऱ्या विषयांचे आकर्षण वाटू लागते. त्यामुळे तो स्वधर्मापासून दूर जाऊन विकर्म म्हणजे करू नये ते कर्म करू लागतो. ह्याही बाबतीत साधकाने सावध रहावे.
एखाद्याला ईश्वरी तत्व समजलं असण्याची खुण म्हणजे, ज्याला ईश्वरी तत्व समजलंय. त्याला जगात सर्वत्र ईश्वरच भरून राहिला आहे असं सतत जाणवत असतं. स्वत:सकट त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती, वस्तू या सर्व ईश्वरस्वरूप आहेत असं तो मानत असतो.
क्रमश: