Ratnagiri News : केवळ युती सरकारच असगोली जि. प. गटाचा विकास करू शकते : संतोष जैतापकर
असगोली जि. प. गटाची निवडणूक हायव्होल्टेज
गुहागर : असगोली जिल्हा परिषद गटातील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. अंजनवेल, वेलदूर, रानवी या गावाला आरजीपीपीएल कंपनीकडून मिळणारा करही थांबला आहे. यामुळे या गटाचा विकास रखडला असून केवळ युती सरकारच या भागाचा विकास करू शकते, असा विश्वास असगोली जि. प. गटाचे शिवसेना उमेदवार संतोष जैतापकर यांनी व्यक्त केला.
गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटाची निवडणूक हायव्होल्टेज निवडणूक ठरली आहे. भाजप-शिवसेना युतीचे शिवसेना उमेदवार संतोष जैतापकर यांनी असगोली गटात प्रचारात मुसंडी मारली आहे. प्रत्येक गावात बैठकांबरोबर वाडी-वस्तीवर मतदारांच्या गाठीभेटी सुरू असताना अनेक समस्यांवर ते ग्रामस्थांजवळ संवाद साधत आहेत. या गटाचे नेतृत्व करणा-यांनी आरजीपीपीएलमधून मिळणा-या करामध्ये खो घातल्याने आज येथील अंजनवेल, वेलदूर, रानवी या गावाचा विकास रखडला आहे. गावच्या विकासासाठी कंपनीकडून कर मिळवून देण्याएवजी कंपनीचीच बाजू घेतली होती.
मात्र ग्रामपंचायतीने न्याय मार्गाने लढा सुरूच ठेवला आहे. यामुळे या गावांना कर मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. या गटातील पाणी योजनाही रखडल्या आहेत. भाजप-शिवसेना युती सरकारकडून पाणी योजना मंजूर होत असताना त्याचे भूमिपूजनाचे श्रेय लाटण्याचेही काम करण्यात येत आहे. मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. गटातील प्रत्येक गाव पाणी योजनेतून सक्षम करण्याचे काम पालकमंत्री उदय सामंत तसेच युतीसरकारच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. गेल्या सात वर्षात गावागावात जाणारे रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. रस्ता करताना ठराविक अंतराचे काम करून पुढील रस्ता तसाच ठेवला जात आहे.
यासाठी येथील जनतेला ठोस विकास कामे करणारे नेतृत्व हवे आहे. जनता तालुक्यातील नेतृत्वाच्या पाठीशी जैतापकर म्हणाले, असगोली जि. प. गटासाठी आपण तालुक्याबाहेरून आलेलो नाही. गुहागर तालुक्यातील सतत तुमच्याबरोबर असणारा चेहरा आपण आहोत. यामुळे येथील मतदारांनी तालुक्यातीलच नेतृत्वाच्या पाठीमागे राहण्याचा निर्धार केला आहे. चुकीचे नेतृत्व निवडून दिल्याने गेली आठ वर्षे येथील गटाचा विकास खुंटला आहे. आपली कोणतीही ठेकेदारी नाही. काम मिळविण्यासाठी विकासकामे नाहीत तर जनतेसाठी विकासकामे केली जातील. गुहागर तालुका पर्यटनातून पुढे येत असताना या गटात अंजनवेल दीपगृह, गोपाळगड किल्ला, समुद्रसफारी, डाŸल्फीन दर्शन असे अनेक ठिकाणी पर्यटक हजेरी लावतात. यामुळे जास्तीतजास्त ठिकाणे पर्यटनासाठी विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा ठाम विश्वास मतदारांना जैतापकर यांनी दिला.