मोहापासून लांब राहणारा आपोआपच मुक्त होतो
अध्याय पहिला
आत्मनात्मविवेकामुळे कोणते कर्म केले म्हणजे आत्म्याचा उद्धार होईल आहे हे समजते आणि त्यानुसार कृती घडते, त्यामुळे साधकाचा आत्मज्ञानाशी योग जुळून येतो. म्हणून त्याला ज्ञानयोग असे म्हणतात. स्वधर्माची जाणीव व आत्मनात्मविवेक समजणे हा योग होय. हा समजला की, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन व्हायला फारसा वेळ लागत नाही. ईश्वरानेसुद्धा जेव्हा जेव्हा अवतार घेतला त्यावेळी अशाच पद्धतीने कर्मे केली. आत्मनात्मविवेकबुद्धी असलेला मनुष्य इहलोकी धर्म व अधर्म या दोहोंच्या फलांचा त्याग करतो. त्यामुळे निरपेक्षतेने विधिपूर्वक कर्म करण्यात कौशल्य मिळते. कर्म करताना ज्याचे लक्ष फळाकडे असते त्याच्या मनात सदैव फळाचेच विचार चालू असल्याने त्याचे सफाईने कर्म करण्याकडे दुर्लक्ष होते. त्याउलट जे मिळेल ते फल ईश्वरी इच्छा म्हणून स्वीकारण्याची ज्याची तयारी असते त्याचे आपोआपच सर्व लक्ष कर्म कुशलतेने पार पाडण्याकडे असते. म्हणून आत्मनात्मबुद्धी प्राप्त करून घेणे व त्यानुसार कौशल्याने कर्मे करणे हाच खरा कर्मयोग आहे. जो असा योग साधेल त्याला अंती मुक्ती मिळेल हे सांगितल्यानंतर बाप्पा अशा कर्मयोगी माणसाबद्दल सांगताना म्हणाले,
धर्माधर्मफले त्यक्त्वा मनीषी विजितेन्द्रिय ।
जन्मबन्धविनिर्मुक्त स्थानं संयात्यनामयम् ।।50।।
अर्थ- धर्म व अधर्म यांच्या फलांचा त्याग करून, मन जिंकलेला व इंद्रियें जिंकलेला मनुष्य जन्मबंधनापासून मुक्त होऊन कल्याणप्रद अशा ठिकाणी म्हणजे मोक्षाला जातो विवरण- ज्यानं मन जिंकलंय त्याला इंद्रिये वश होतात. जो कर्मफळांचा त्याग करायला तयार होतो त्याला नवीन इच्छा होत नाहीत. त्यामुळे त्याच्या मनाचा इंद्रियांवर ताबा असल्याने त्यांना गप्प बसवण्यात मन यशस्वी होते. इंद्रियांवर ताबा मिळवलेला मनुष्य त्याच्या इच्छेनुसार इंद्रियांनी त्याला काय महिती द्यायची आणि कोणती द्यायची नाही हे ठरवतो. सर्वसामान्य माणसाप्रमाणे इंद्रिये त्याच्यावर अंमल गाजवू शकत नसल्याने ती त्याला मोहात पाडू शकत नाहीत. साहजिकच मोह झालेल्या वस्तू मिळवण्यासाठी त्याला कोणतेही अनिष्ट कर्म करावे लागत नसल्याने त्यांची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते. गोड पदार्थ आवडणाऱ्याला जर मधुमेह झाला असेल तर गोड खाण्याची इच्छा झाल्यास जीभ चळवळ करू लागते पण गोड पदार्थ खाण्याचे अनिष्ट परिणाम मधुमेही माणसाच्या मनाला माहीत असल्याने त्याने गोड पदार्थ खाण्याच्या आनंदाला आळा घातलेला असतो. जिभेला आवर घातल्याने त्याच्या शरीराची हानी होत नाही. त्याप्रमाणे जो मोहापासून लांब राहतो तो आपोआपच मुक्त होतो. इंद्रियांनी दाखवलेल्या विविध गोष्टीमुळे माणसाला त्या आपल्या जवळ हव्यात असे वाटून त्यांचा मोह होतो. मोहामुळे बुद्धी क्रियाशील होऊन त्या वस्तू मिळवण्यासाठी बरेवाईट काय काय करायला लागेल ते सुचवत राहते. हे सर्व माणसाच्या ठिकाणी असलेल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे घडते. त्यावर मात करणे आवश्यक आहे असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
यदा ह्यज्ञानकालुष्यं जन्तोर्बुद्धि क्रमिष्यति ।
तदासौ याति वैराग्यं वेदवाक्यादिषु क्रमात् ।। 51।।
अर्थ-जेंव्हा मनुष्य अज्ञानामुळे त्याच्या बुद्धीवर बसलेल्या धुळीवर मात करेल तेव्हा वेदातील मोहक वचनाबद्दल त्याला वैराग्य प्राप्त होईल. विवरण- निरपेक्षपणे कर्म करुन ईश्वराला अर्पण करावे. कुणाकडे काही मागू नये आदि गोष्टी कळतात पण वळत नाहीत अशी माणसाची अवस्था असते. कितीही नाही म्हंटले तरी माणसाला काहितरी अपेक्षेने कर्म करण्याचा मोह काही सुटत नाही.
क्रमश: