करुळ घाटात सोमवारपासून एकेरी वाहतूक
सिंधुदुर्गनगरी :
वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिले जाते. करुळ घाटमार्गाचे काम दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणच्या विकासाला चालना मिळणार असल्याने सोमवार 24 फेब्रवारीपासून वैभववाडी ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक पुढील 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा संदर्भात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी उपस्थित होते.
गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (Safety Norms ) प्राधान्य देत या घाटाचे काम पूर्ण झाले आहे. दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच घाटाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. हे काम करताना प्रवासी सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. या घाटातून पहिल्या टप्प्यात वैभववाडी ते कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. दुतर्फा वाहतूक सुरू करण्याबाबत दहा मार्चनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.