प्रेयसीसाठी वाटेत ते...
प्रेमात पडलेली माणसे आपले प्रेम सफल व्हावे, यासाठी वाटेल ते करायला तयार असतात, असे मानण्याची प्रथा आहे. पण यासाठी कोणते टोक गाठावे, याचीही काही मर्यादा आहे. ती पाळली नाही, तर हानी अशा लोकांचीच होते. उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर येथे एका युवकाची अशीच अवस्था झाली आहे. या युवकाचे नाव सूरज भास्कर असे आहे. एका युवतीवर त्याचे प्रेम होते आणि तिच्याशी त्याला विवाह करायचा होता. पण त्यासाठी त्याने जो मार्ग निवडला, तो अद्भूत होता. आपण डॉक्टर झाल्यास आपली प्रेयसी आपल्याशी विवाह करण्यास राजी होईल, असे त्याला वाटत होते. म्हणून त्याने ‘नीट’ ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा देऊन पाहिली. तथापि, त्याला यश आले नाही. त्यामुळे त्याने एक अघोरी उपाय शोधला. त्याने इंजेक्शन देऊन स्वत:चा एक पाय बधीर करुन घेतला आणि त्या अंगठा वगळता बाकीची बोटे कापली. असे केल्याने दिव्यांगांसाठी आरक्षित असणाऱ्या जागांमधून आपल्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, अशी त्याची समजून होती. त्या समजुतीपोटी त्याने स्वत:ची बोटे कापून घेतली होती.
तथापि, कोणत्याही डॉक्टरने त्याला तो दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर त्याने हेतुपुरस्सर स्वत:ला दिव्यांग बनविण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या विरोधात तक्रार सादर करण्यात आली. त्याची चौकशी होत असताना त्याचे कॉल रेकॉर्डस् तपासण्यात आले. त्यातून त्याची एक प्रेयसी आहे आणि तिचे मन जिंकण्यासाठी डॉक्टर व्हायचे आणि डॉक्टर होण्यासाठी स्वत:ला दिव्यांग बनवायचे, हे त्याचे कारस्थानही उघड झाले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार होत आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर अभियोग चालविला जाणार आहे. एकंदरच, त्याची अवस्था आता ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ अशी झाली आहे. ज्यासाठी त्याने स्वत:चीच बोटे कापून घेतली, तो उद्देश आता पूर्ण होणार नाही, हे निश्चित आहे. तसेच तो डॉक्टर होणार नसल्याने त्याच्या प्रेयसीशी त्याचा विवाह होणेही आता अशक्य आहे, कारण त्याच्यावर आता कारवाई होणार आहे. अशा प्रकारे प्रेमसाफल्यासाठी त्याने मर्यादा न पाळल्याने दोन्ही बाजूंनी त्याची हानी होणार आहे. अनेकांच्यासाठी त्याची ही कथा बोधप्रद ठरणार आहे.