Ambabai Temple : चौथ्या दिवशी सूर्यकिरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यात
किरणोत्सवाची आज होणार सांगता
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी (रविवार) सूर्यकिरणे अंबाबाई मंदिरात दाखल होऊन ती देवीच्या गाभाऱ्यातही गेली होती. परंतू गाभाऱ्यातील संगमरवरी पायरीवर सूर्यकिरणे गेली असताना त्यांच्या आड ढगाळ वातावरण आले. हे वातावरण सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कायम राहिले. त्यामुळे सूर्यकिरणेगाभाऱ्यात जाऊनही ती देवीच्या मूर्तीपर्यंत गेलीच नाहीत. परिणामी मंदिर आवारातील एलईडी स्क्रिनवर किरणोत्सव पाहण्यासाठी जमलेल्या भाविकांना निराश होऊन मंदिर सोडावे लागले.
दरम्यान, दिवसभर आकाश स्वच्छ होते. आकाशात ढगाळ वातावरणच नसल्याने सकाळ, दुपारप्रमाणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूर्यप्रकाश लख्ख होता. सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांनीसूर्यकिरणे अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर आली होती. यावेळी किरणांची तीव्रता १३ हजार ५०० (एका स्क्वेअर मीटरच्या जागेत एका मेणबत्तीतून पडणारा प्रकाश हा एक लक्स अशा प्रमाणात मोजला जातो.) इतकी होती. याचवेळी किरणोत्सवाला सुरुवात झाल्याचे ही गृहीत धरले. पुढील ३७ मिनिटांत सूर्यकिरणे मंदिर आवारात सध्या बांधकाम सुरू असलेला गरुड मंडप, मंडपातील देवीची सदर व मंदिरातील अंतरंगातील गणपती चौकअसा प्रवास करत पुढे कासव चौकात आली.
यावेळी मात्र किरणांची तीव्रता फक्त आणि फक्त २८ लक्स इतकी कमी झाली होती. परंतु सूर्यकिरणे जेव्हा कासव चौकातून मंदिराच्या पितळी उंबरठ्याजवळ पोहोचली तेव्हा त्यांची तीव्रता २८ वरुन ५३ लक्स इतकी वाढली होती. याच तिव्रतेने किरणे अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत जातील, असे सर्वांनाच वाटत होते. तसेच सूर्यकिरणे देवीच्या गाभाऱ्यातही गेली होती. आता नक्कीच ती देवीच्यामूर्तीवर जातील अशी आशा पल्लवीत झाली होती.
शिवाय ६ वाजून ४ मिनिटांनी किरणे गाभाऱ्यातील पहिल्या संगमरवरी पायरीवर पोहोचली होती. दरम्यानच्या काळात आकाशात जमू लागलेले ढग सूर्यकिरणांच्या आडवे आले. साडे सव्वा सहा वाजेपर्यंत हे ढग किरणांच्या आहवेच राहिले. यानंतर लगेचच सूर्यास्त होऊन किरणोत्सावाचा कालावधी संपला. तसेच सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीवर जातील अशी भाविकांनी धरलेली अपेक्षाही फोल ठरली.