बेळगुंदी येथे सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले
शेतकऱ्यांनी एकजुटीने विरोध करताच अधिकाऱ्यांसह कर्मचारी फिरले माघारी
बेळगाव : रिंगरोड विरोधात काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. तरीपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व्हे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बेळगुंदी येथे सर्व्हे करण्यासाठी शुक्रवारी काही कर्मचारी गेले होते. त्यावेळी त्यांना विरोध करून माघारी धाडले आहे. बेळगुंदी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यामुळे हे कर्मचारी माघारी गेले असले तरी शेतकऱ्यांनीही आता न्यायालयाकडून स्थगिती मिळविण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील 32 गावांतील सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याचा घाट केंद्र आणि राज्य सरकारने घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरील लढाई लढली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हरकती दाखल केल्या होत्या. मात्र कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या हरकती फेटाळून लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे काही शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घेणे अशक्य आहे. त्याचा गैरफायदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेत आहे. अचानक काही ठिकाणी जाऊन सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत आहे. शुक्रवारी बेळगुंदीमध्ये जाऊन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे सर्व्हे करण्यासाठी आलेले अधिकारी माघारी फिरले आहेत. यावेळी किशोर पाटील, नामदेव गुरव, अरुण गुरव, सुरेश मोटणकर, मारुती बेळगावकर, जेरॉन लोबो, शिवाजी शिंदे, भरमू गावडा, शंकर पाटील, उमेश चव्हाण, विक्रम बाचीकर यासह इतर शेतकरी उपस्थित होते.