एनएसए डोवाल यांचे ‘आखात’ मिशन
सौदी अरेबियानंतर अबूधाबीत दाखल : अध्यक्ष अल नाहयान यांच्याशी चर्चा
वृत्तसंस्था/ अबूधाबी
मध्यपूर्वेत तणावादरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे अबूधाबी येथे पोहोचले. युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची त्यांनी भेट घेतली आहे. बैठकीत डोवाल आणि अल नाहयान यांनी क्षेत्रीय स्थिरता आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या भूराजकीय घटनाक्रमावर चर्चा केली आहे. बैठकीचा मुख्य जोर सुरक्षा चिंता, आर्थिक हितांसोबत इस्रायल-इराण युद्धानंतर क्षेत्रात वाढत्या तणावादरम्यान परस्पर ताळमेळ राखण्यावर होता.
एनएसए डोवाल यांचा हा दौरा भारताच्या आखाती देशांपर्यंत पोहोच निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा हिस्सा आहे. अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान हे प्रयत्न गतिमान करण्यात आले आहेत. यापूर्वी 20 एप्रिल रोजी डोवाल यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशावर करण्यात आलेल्या या दौऱ्यात सौदी अरेबियाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत डोवाल यांनी चर्चा केली होती.
पंतप्रधानांच्या निर्देशावर आखाती देशांमध्ये आमचे आउटरीच जारी असल्याचे वक्तव्य विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी डोवाल यांच्या दौऱ्याविषी माहिती देताना सांगितले होते.
सौदीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
रियाध येथील चर्चेला क्षेत्रीय स्थिरता निर्माण करण्यासाठी विचारांचे एक महत्त्वपूर्ण आदान-प्रदान आणि द्विपक्षीय संबंधांना मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल संबोधिण्यात आले. सौदी अरेबियात झालेली चर्चा 4 मुख्य मुद्द्यांवर केंद्रीत होती.
-जागतिक व्यापारी मार्गांवर धोके असतानाही स्थिर पुरवठासाखळी सुनिश्चित करणे.
-होर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्शियन उपसागराच्या मोठ्या क्षेत्रातील चिंतांना दूर करणे.
-गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि दोन्ही देशांमधील सुरक्षा विषयक ताळमेळ वाढविणे.
-भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील आर्थिक संबंध मजबूत करणे, त्यात विविधता आणणे.