अब जल्दी करनी पडेगी !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता आपल्याला लग्नाची गडबड करावी लागणार असा संकेत दिला आहे. त्यांनी सोमवारी रायबरेली मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांना आपण लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, लवकरच आपण त्या विषयाकडे लक्ष देऊ. अब जल्दी करनी पडेगी असे उद्गार त्यांनी काढले. हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी आपला पारंपरिक अमेठी मतदारसंघ सोडून आपल्या आईचा रायबरेली मतदारसंघ निवडणूक लढविण्यासाठी निवडला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर अमेठीतून निवडणूक लढविण्यास ते घाबरत असल्याचा आरोप केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभूत केले होते. यंदाही भारतीय जनता पक्षाने इराणी यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. तो टीकेचा विषय बनला आहे.
प्रियांका गांधींचे कौतुक
रायबरेलीतील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांनी रायबरेलीत केलेल्या प्रचाराचे कौतुक केले. त्यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळल्यामुळे मी इतरत्र प्रचाराला जाण्यासाठी मोकळा आहे. प्रियांका गांधी यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत, असे राहुल गांधी यांनी रायबरेली येथील जाहीर सभेत प्रतिपादन केले.