आता घरबसल्या मिळणार महसूल नोंदी
राज्य सरकारची जनस्नेही योजना जारी : ग्रामीण भागातील नागरिकांना होणार लाभ
बेळगाव : राज्यातील जनतेला जमिनीच्या नोंदी मिळविण्यासाठी महसूल कार्यालयात जावे लागू नये, यासाठी विभागाने जनस्नेही योजना जारी केली आहे. त्यानुसार नागरिकांना घरात बसून प्रमाणित नोंदी मिळविता येणार असून अटलजी केंद्रांवरही ते मिळवू शकतात. यामुळे नागरिकांना सोयीचे झाले आहे. या योजनेमुळे जमिनीच्या नोंदी घेण्यासाठी आता तहसीलदार कार्यालयात जावे लागणार नसून अटलजी केंद्र, नाडा कचेरी किंवा घरी बसून ऑनलाईन प्रत मिळता येणार आहे.
भू-सुरक्षा व महसूल अभिलेख ग्रंथालय योजनेंतर्गत शतकानुशतके जुन्या जमिनीच्या नोंदी स्कॅन व डिजिटलायझेशन केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात अ व ब श्रेणीतील 100 कोटी नोंदी स्कॅन करून अपलोड केल्या जाणार आहेत. 27 फेब्रुवारीअखेर भू-सुरक्षा सॉफ्टवेअरमध्ये 71.19 कोटी नोंदी अपलोड करण्यात आल्या आहेत. राज्यातील 236 तालुक्यांपैकी 102 तालुका कार्यालयांमध्ये जुन्या नोंदीचे स्कॅनिंग व अपलोडींग पूर्ण झाले असून उर्वरित 130 तालुक्यांमध्ये अद्याप प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील जनतेला आता जमिनीच्या नोंदी मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नसून कार्यालयात न जाता घरबसल्या नोंदी मिळविता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करून नोंदी मिळविता येणार असून महसूल विभागाने ग्रा. पं. मधील बापूजी सेवा केंद्रांवरही ही सेवा उपलब्ध करून उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सहजरित्या नोंदी मिळविता येणार असून सरकारी कामे उरकण्यासाठी वेळेचीही बचत होणार आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांना सर्वाधिक लाभ होणार आहे.