आता आंदोलनाचाच पर्याय ,अनगोळ ग्रामस्थांचा इशारा
बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत अनगोळमध्ये विविध कामे करण्यात आली आहेत. रस्ते, गटारी तसेच ड्रेनेजचे कामदेखील करण्यात आले आहे. या कालावधीत अनगोळमधील शेवटच्या बसथांब्यापर्यंत जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहेत. ध. संभाजी चौक ते रघुनाथपेठपर्यंतच्या रस्त्याचे काम बाकी आहे. त्यामुळे बस वाहतूक बंद असून विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत कामे करण्यात आली. मात्र ती कामे अत्यंत संथगतीने करण्यात आली आहेत. अजूनही बरीच कामे अर्धवट आहेत. ध. संभाजी चौक ते रघुनाथपेठ पर्यंतच्या ड्रेनेजचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे अनगोळ येथील मराठी शाळेपासूनच बस माघारी फिरत आहे. त्या ठिकाणीच बसेस थांबत आहेत. त्यामुळे अनगोळ येथील नागरिकांना पायी चालत यावे लागत आहे. वृद्ध महिला आणि विद्यार्थी यांना त्रास होत आहे. सदर रस्ता पूर्ण करावा, यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता आंदोलन करणार असल्याचा इशारा अनगोळवासियांनी दिला आहे.