माकपकडून आता ‘बांग्ला बचाओ यात्रा’
राजकीय जनाधार परत मिळविण्याचा प्रयत्न : भाजप-तृणमूल निशाण्यावर
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये गमावलेला जनाधार पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नात माकपने मोठ्या पुढाकाराची घोषणा केली आहे. पक्षाने 29 नोव्हेंबर ते 17 डिसेंबरपर्यंत 1 हजार किलोमीटर लांब ‘बांग्ला बचाओ यात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस सरकारचे ‘लूट, भ्रष्टाचार आणि लोकशाहीविरोधी वर्तन’ तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या ‘लोकविरोधी धोरणां’ना यात्रेच्या माध्यमातून उघड करणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे. कूचबिहार जिल्ह्याच्या तुफानगंज येथून 29 नोव्हेंबर रोजी यात्रा सुरू होईल आणि 17 डिसेंबर रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील कमरहाटी येथे समारोप होणार आहे.
यादरम्यान यात्रा 11 जिल्हे आणि आसपासच्या भागांमध्ये 1 हजार किलोमीटरचे अंतर व्यापणार आहे. राज्यातील अव्यवस्थेमुळे त्रस्त असलेल्या प्रत्येक इसमापर्यंत पोहोचेल अशाप्रकारे यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आल्याचे पक्षाचे सांगणे आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शेतकरी आणि मजुरांच्या समस्या, चहाच्या मळ्यांमधील मजूर, बिडी कामगार आणि स्थलांतरित मजुरांच्या समस्या, महागाई, बेरोजगारी इत्यादी मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. तृणमूल सरकारने ‘लूट, भय अणि खंडणीआधारित शासन’ चालवून लोकांचे जगणे असह्या केल्याचा आरोप माकपने केला आहे.
ही सुधाराची यात्रा
बंगाल सरकारने राज्याला भ्रष्टाचार आणि अराजकतेची कहाणी करून सोडले आहे. दुसरीकडे केंद्राच्या धोरणांमुळे गरीब, शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त केले आहे. ही यात्रा आमचे अधिकार, सन्मान आणि लोकशाहीला बहाल करण्याचा संकल्प असल्याचा दावा माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी केला आहे.
यात्रा का महत्त्वपूर्ण
3 दशकांपर्यंत बंगालमध्ये सत्तेवर राहिलेला माकप मागील 10 वर्षांपासून सातत्याने राजकीयदृष्ट्या कमकुवत झाला आहे. 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. तर 2021 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे खातेही उघडले नव्हते. 2011 मध्ये डाव्या आघाडीची मतांची हिस्सेदारी 39 टक्के होती. 2021 मध्ये हे प्रमाण कमी होत 4.7 टक्के राहिले आहे. दुसरीकडे भाजप आता राज्यात मुख्य विरोधी पक्ष ठरला असून त्याला सुमारे 39 टक्के मतांची हिस्सेदारी प्राप्त आहे. राज्यात तृणमूल आणि भाजप हेच मुख्य पक्ष ठरले आहेत.