मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याची सूचना
जिल्हाधिकारी नितेश पाटील : अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, कोणत्याही गोंधळाला वाव देऊ नये
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी कर्तव्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवर सतर्क रहावे. मतदान केंद्र अधिकारी, साहाय्यक अधिकारी यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कोणत्याही गोंधळाला वाव देऊ नये, दक्ष राहून कार्य सुरळीत पार पाडावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. वनिता विद्यालय येथील माध्यमिक शाळेमध्ये बुधवारी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या अधिकाऱ्यांना आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मतदान केंद्र अधिकारी, साहाय्यक अधिकाऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीच्या कामासाठी पहिल्यांदाच नियोजित केलेल्या अधिकाऱ्यांनी गोंधळ न करून घेता प्रशिक्षण देणाऱ्यांकडून योग्य माहिती करून घ्यावी. प्रशिक्षणासंदर्भातील आवश्यक ती माहिती पुस्तक व सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
मतदान करणे आवश्यक
निवडणुकीच्या कामासाठी नियोजित केलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी पोस्टल मतदानाची सोय असून प्रशिक्षणादरम्यानच ही प्रक्रिया पूर्ण करावी. पोस्टल मतदानासंदर्भात अधिक दक्ष राहून संग्रह प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याची सूचना करण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मतदान यंत्र जोडणी व त्यानंतर मतदान प्रक्रिया कशा प्रकारे राबवायची, याचे स्वत: प्रात्यक्षिक दाखविले. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट जोडण्यासंदर्भात दक्ष रहावे, कोणताच गोंधळ करून घेऊ नये, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी शकिल अहम्मद, तहसीलदार सिद्राय भोसगी यांसह नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.