सरकारला धोका नाही : पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : मुडा प्रकरणी राज्य सरकारची चौकशी करण्याबाबत उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तथापि त्यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही व सिद्धरामय्या यांच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे मंगळवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. सर्व खासदार, आमदार, पक्षश्रेष्ठी हे सिद्धरामय्यांच्या सोबत आहेत. तेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याबाबत कोणाचीच तक्रार नाही. कोणत्या पद्धतीने लढा द्यायचा हे सिद्धरामय्या यांना माहीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपतर्फे आज सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. पण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजप सरकार सत्तेवर असतानासुद्धा मुडा अंतर्गत जागा दिल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील अनेक लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. मग गरज पडल्यानंतर त्यांना आपल्या पक्षात घेण्याचे राजकारण करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. 25 केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पण ते सर्व पदावर आहेत. याकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी आमदार राजू सेठ, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बेळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी उपस्थित होते.