निवडणूक होईपर्यंत वसुली नाही! प्राप्तिकर नोटिसीसंबंधी काँग्रेसला मोठा दिलासा
: केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्राप्तीकर वेळेवर न भरल्यामुळे प्राप्तीकर विभागाने काँग्रेसला एकंदर 3 हजार केटी रुपयांहून अधिकची थकबाकी वसूल करण्याची नोटीस धाडली आहे. मात्र, लोकसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत या नोटीसीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यासाठी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.
प्राप्तीकर विभागाने काँग्रेसला कराच्या थकबाकीसंबंधी अनेक नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज काँग्रेसने करलवाद आणि अपेलेट करप्राधिकरणाकडे केला होता. पण दोन्ही ठिकाणी निराशा हाती लागली होती. नंतर काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात स्थगितीसाठी प्रयत्न केला. पण तेथेही यश आले नाही. नंतर सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला गेला.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सोमवारी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठासमोर केंद्र सरकारने बाजू मांडली. महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर निवेदन केले. काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे. सध्या लोकसभेची निवडणूक अगदी तोंडवर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाविरोधात कोणतीही तीव्र कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कराची थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत थांबविण्यात येईल. निवडणुकीनंतर नियमानुसार पुढील पावले उचलण्यात येतील, असे प्रारंभीच मेहता यांनी स्पष्ट केले.
सिंघवी यांच्याकडून प्रशंसा
लोकसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत काँग्रेसकडून करवसुली केली जाणार नाही, ही केंद्र सरकारची भूमिका प्रशंसनीय आहे, अशी टिप्पणी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. निवडणुकीनंतर काँग्रेसही यासंबंधी सविस्तर भूमिका न्यायालयात स्पष्ट करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.