राजधानीत आजपासून ‘नो पे पार्किंग’!
महापौर रोहित मोन्सेरात यांची घोषणा, 31 मेपर्यंत वाहनचालकांना दिलासा
प्रतिनिधी/ पणजी
राजधानीत येणाऱ्या लोकांना पे पार्किंगच्या नावाखाली पडणारा भूर्दंड पुढील दोन महिने पडणार नाही. महापौर रोहित मोन्सेरात यांनी शनिवारी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांमुळे पणजीत सर्वत्र खोदकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे एका बाजूने वाहने चालविण्यासाठीसुद्धा धड रस्ते उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती असताना कुठेतरी ‘नशिबाने’ मिळालेल्या जागेत एखाद्याने वाहन पार्क केल्यास लगेचच पे पार्किंग कंत्राटदाराचे कर्मचारी त्याच्याकडे शुल्काची मागणी करत होते. त्यामुळे अत्यंत उद्वीग्न आणि संतापजनक मनस्थितीत लोक शुल्क फेडत होते.
मागील सुमारे दीड वर्षापासून पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुऊ आहेत. त्यामुळे पालिका परिसरात येणाऱ्या जवळजवळ सर्व परिसरात रस्ते खोदण्यात आले आहेत. परिणामी स्थानिक तसेच कामधंद्यानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी जागाच मिळत नाही, अशी परिस्थिती असते. तरीही जेथे कुठे थोडीशी जागा मिळेल तेथे नागरिक वाहने पार्क करतात. तरीही त्यांना पार्किंगसाठी शुल्क भरावे लागते.
विरोधी, सत्ताधारी नगरसेवकांनीही घेतला होता आक्षेप
या प्रकारास आक्षेप घेऊन गत काही महिन्यांपासून अनेक वाहन चालकांनी संताप व्यक्त केला होता. त्याशिवाय विरोधी नगरसेवकांनीही अनेकदा पालिका बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून त्यास विरोध दर्शविला होता. त्यात सत्ताधारी गटातीलही काही नगरसेवकांचा समावेश होता. स्मार्ट सिटीच्या कामांचा
भूर्दंड चालकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप करताना सदर कामे पूर्ण होईपर्यंत पार्किंग शुल्क घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती.
तरीही पालिकेने त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष चालविले होते. परंतु आता महापौर रोहित मोन्सेरात यांनी सदर पार्किंग शुल्क गोळा करणे तात्पुरते स्थगित केले आहे.
स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी दिलेल्या 31 मे पर्यंतच्या कालावधीसाठी अर्थात पुढील दोन महिने वाहन चालकांकडून कोणतेही पार्किंग शुल्क आकारण्यात येणार नाही असे जाहीर केले.
पालिका मंडळाच्या या निर्णयामुळे पणजीत येणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.