भाजपचे हुकूमशहा सरकार यापुढे नको - उद्धव ठाकरे
सावंतवाडी -
सावंतवाडीतील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही कालही आणि आजही शत्रू नव्हतो. आम्ही भाजप सोबतच होतो. शिवसेना भाजप सोबत होती. परंतु तेव्हा भाजपने आम्हाला दूर केलं.युतीत असताना विनायक राऊत खासदार म्हणून निवडून आले आणि म्हणून भाजपचे पंतप्रधान सत्तेवर आले. आज देखील आम्ही हिंदुत्व सोडू शकत नाही. भगवा झेंडा आमच्याकडे कायम आहे . परंतु या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचे काम भाजप करते आहे . मोदींच्या कार्यकर्त्यांनी देशाचे काम केले असते तर आज त्यांच्यावर पक्षफोडी करण्याची वेळ आली नसती. भाजप सरकार इन्कम टॅक्स, ईडी यामध्येच अडकलेले आहे. नौदल दिनाला पंतप्रधान मोदी कोकणात आले . पण, जाताना काहीच देऊन गेले नाहीत. वाटलं होतं कोकणासाठी काहीतरी घोषणा करतील . पण तसे काहीच झाले नाही. उलट आता भीती वाटते की ते कोकणाला काही देण्यासाठी येत नाहीत तर घेण्यासाठी येतात. कोकणातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार आणि असे कित्येक प्रकल्प यापुढे जातील. कोकणाला चक्रीवादळांनी धडक दिली . पण तेव्हाही कोकणासाठी काहीही दिले गेले नाही. यापुढे इंडिया आघाडीचे सरकार येईल. परंतु भाजपचे हुकूमशहा सरकार आम्हाला नको असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.