बगल मार्गासाठी एकही घर, मंदिराला धक्का लागणार नाही!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले भोमवासियांना आश्वासन
प्रतिनिधी / साखळी
भोम येथील गावातून नियोजित बगल मार्गासाठी गावातील एकही घर किंवा मंदिराला धक्का लागणार नाही. आपल्या स्वत:च्याही मनात तसे काही करायचे नसून लोकांनी गैरसमजुतीत न राहता सोमवारी सकाळी मंत्रालयात येऊन या बायपास रस्त्यासंदर्भात तांत्रिक विभागाशी चर्चा करावी. तांत्रिक विभागाकडून यासंदर्भात सर्वती माहिती व मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर लोकांच्या आग्रहास्तव हे तांत्रिक पथक भोम येथे येऊन प्रत्यक्षात बायपास रस्त्याची आखणी व आराखडा लोकांना कथन करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भोमवासियांना सांखळी येथे दिले.
मधलावाडा भोम येथील सुमारे 50 लोकांनी शनिवार दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साखळी रवींद्र भवनच्या बाहेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या लोकांना सामोरे जात लोकांच्या मनात असलेल्या विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी आपण सदैव तयार असून आपण कोणालाही भेटण्यास कधीही नकार देत नाही, असे सांगून बायपासच्या विषयावर चर्चा केली.
सध्या बायपासच्या संदर्भात लोकांमध्ये अनेक गैरसमजुती पसरविण्यात आलेल्या आहेत. त्या गैरसमजुती दूर करण्यासाठी मंत्रालयात गावातील लोकांनी यावे नियोजित बायपास हा कशा पद्धतीने साकारला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती तांत्रिक पथक लोकांना देणार आहे. जर एखादे घर किंवा मंदिराचा भाग किंवा अन्य वास्तू या बायपासमुळे भंग होत असेल, तर तो भाग किंवा ती वास्तू वगळून बायपास रस्ता साकारण्यास आपणही तयार आहे. त्यासाठी लोकांनी सकारात्मकपणे सरकारला साथ देत सर्वप्रथम या बायपास रस्त्याच्या आराखड्याला समजून घ्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी मधलावाडा भोम येथील लोकांना सांगितले.
यावर भोमवासियांनी सदर तांत्रिक विभाग भोम येथे गावात येऊन प्रत्यक्षात आम्हाला रस्त्याची आखणी व इतर नियोजन दाखवू शकेल का? असा प्रश्न केला असता, मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम आपण सर्वजण मंत्रालयात या हा प्रकल्प व मार्गाचा आराखडा समजून घ्या. त्यानंतर तांत्रिक पथकाला गावात पाठवून संपूर्ण आराखडा प्रत्यक्षात तुम्हा सर्वांना दाखवण्याची सूचना आपण स्वत: करीन व तांत्रिक पथक सर्व लोकांना सदर आराखडाही दाखवेल, असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत मधलावाडा भोमवासियांनी समाधान व्यक्त करत आभार मानले. सोमवारी मंत्रालयात भेट घेण्यात येणार आहे. यावेळी डिचोली पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा रवींद्र भवनच्या बाहेर जमा होता.