‘त्या’ कर्मचार्यांना डचू नव्हेेे; मनपाकडे हस्तांतरण
एलअँडटीच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, नोटिसीचा गैरअर्थ काढल्याने संभ्रम
बेळगाव : चोवीस तास पाणीपुरवठा योजना 31 मे 2026 रोजी पूर्ण होणार असल्याने एलअँडटीकडे कार्यरत असलेल्या 320 पैकी 50 कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेने हस्तांतरण करून घ्यावे, असा पत्रव्यवहार एलअँडटीकडून मनपाला करण्यात आला आहे. तसेच याबाबतची नोटीसदेखील संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र नोटिसीचा गैरअर्थ काढून कामगारांना कामावरून कमी करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे, हे चुकीचे आहे, अशी माहिती एलअँडटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी ‘तरुण भारत“शी बोलताना दिली.
पाणीपुरवठा महामंडळाकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे हस्तांतरण महानगरपालिकेकडे करण्यात आले होते. मात्र ज्यावेळी पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीकडे सोपविण्यात आली. त्यावेळी पुन्हा महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याशी संबंधित कर्मचाऱ्यांचे हस्तांतरण एलअँडटीकडे केले. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करताना मनपा आणि एलअँडटी कंपनीमध्ये करार करण्यात आला आहे. ज्यावेळी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईल. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांचे पुन्हा महानगरपालिकेकडे हस्तांतरण केले जाईल, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे, असे एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हस्तांतरण करण्यासंदर्भात पुन्हा प्रक्रिया सुरू
31 मे रोजी चोवीस तास पाणीपुरवठा योजना पूर्ण होणार असल्याने 320 पैकी 50 कर्मचाऱ्यांचे हस्तांतरण महानगरपालिकेने करून घ्यावे, असे मनपाला कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर तशी नोटीस कर्मचाऱ्यांनाही देण्यात आली आहे. मात्र आपणाला कामावरून कमी करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. एकंदरीत नोटिसीचा गैरअर्थ काढला असून, कोणालाही कामावरून कमी केलेले नाही. पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी म्हणजेच महानगरपालिकेकडे त्यांचे हस्तांतरण करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, असेही एलअँडटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी सांगितले.