पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा नाही
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर शांघाय सहकार्य परिषदेच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी पाकिस्तानला जात असले तरी या दौऱ्यात त्यांची पाकिस्तानशी कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. ही परिषद एका बहुराष्ट्रीय चर्चेचा भाग आहे. त्यामुळे द्विपक्षीय चर्चेला कोणतेही स्थान नाही. पाकिस्तानसंबंधी भारताची भूमिका स्पष्ट असून माझ्या पाकिस्तान दौऱ्यामुळे तिच्यात परिवर्तन होईल, अशी अपेक्षा कोणी करु नये, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्याने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.
त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये चर्चेचा प्रारंभ होऊ शकतो, अशी वृत्ते दिली आहेत. मात्र, त्यांच्यात तथ्य नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादावर नियंत्रण आणत नाही व दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचे धोरण सोडत नाही, तोपर्यंत भारत त्या देशाशी कोणतीही चर्चा करणार नाही. दहशतवादाचे संकट साऱ्या जगाने गंभीरपणे ओळखले आहे. तरीही पाकिस्तान आजही दहशतवादापासून स्वत:ला दूर करण्याच्या विचारात नाही. दहशतवाद हे या देशाचे एक धोरणच असल्याची स्थिती जोपर्यंत आहे, तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होण्याची शक्यता नाहीच, असे जयशंकर यांनी गुजरातमधील एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे.