For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीश नाराज, स्टॅलिन कामात !

06:01 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
नितीश नाराज  स्टॅलिन कामात
Advertisement

इंडी’ आघाडीची बैठक लांबणीवर, सोरेनही अनुपलब्ध

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाची तीव्र प्रतिक्रिया विरोधकांच्या आघाडीत उमटताना दिसून येत आहे. 3 डिसेंबरला या निवडणुकांचे परिणाम समोर आल्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीची बैठक 6 डिसेंबरला बोलाविली होती. मात्र आघाडीतील जवळपास सर्व मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी बैठकीला येण्यास नकार दिल्याने आता ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही बैठक आता 17 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

30 नोव्हेंबरला संपलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतगणना 3 डिसेंबरला करण्यात आली होती. पाचपैकी चार राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. केवळ तेलंगणात पक्षाला बहुमत प्राप्त झाले होते. त्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षांच्या आघाडीतले महत्त्व कमी झाले आहे. काँग्रेसच्या प्रभावहीन कामगिरीवर तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी जोरदार टिका केली आहे. तसेच द्रमुक, संजद, झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांनी काँग्रेसने बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. परिणामी बैठक रद्द झाली.

महत्त्वाचे नेते अनुपलब्ध

6 डिसेंबरच्या प्रस्तावित बैठकीसाठी आपण पूर्वनिर्धारित कामांमुळे येऊ शकणार नाही, असा निरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन करुणानिधी यांनी पाठविला आहे. तर काँग्रेसवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याचे समजते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही नकार कळविला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचे येणे निश्चित नाही. ममता बॅनर्जी यांनी आपल्या घरात विवाहाचा कार्यक्रम असल्याचे कळविले आहे. अशा स्थितीत बैठक रद्द करणेच श्रेयस्कर आहे, अशा निर्णयापत्र काँग्रेस नेतृत्व येऊन पोहचले आहे.

आता होणार अनौपचारिक बैठक

अधिकृत बैठक लांबणीवर पडली असली तरी 6 डिसेंबरला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक अनधिकृत आणि अनौपचारिक बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. आघाडीतील प्रत्येक पक्ष आपले एक किंवा दोन प्रतिनिधी पाठविणार असल्याची माहिती देण्यात आली.

प्रथम जागावाटप मग पुढील चर्चा

3 राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसला अधिक महत्त्व न देण्याचे धोरण सप प्रमुख अखिलेश यादव यांनी स्वीकारले आहे. अखिलेश यादव यांच्यासह अन्य प्रादेशिक नेत्यांचे प्रमुख आता काँग्रेससोबत केवळ जागावाटपावर चर्चा करु इच्छितात, म्हणजेच प्रथम जागावाटप निश्चित व्हावे, मगच आघाडीत उर्वरित निर्णय घेतले जावेत असे या नेत्यांचे म्हणणे आहे. ज्या राज्यात जो पक्ष मजबूत असेल त्याला अन्य पक्ष तेथे मदत करतील हा फॉर्म्युला असून त्यानुसारच इंडिया आघाडीला वाटचाल करावी लागणार असल्याचे अखिलेश यांनी मंगळवारी म्हटले आहे. यापूर्वी वाराणसी येथे बोलताना अखिलेश यांनी निवडणूक निकालासोबतच अहंकारही समाप्त झाल्याचे म्हणत काँग्रेसला लक्ष्य पेले होते.

Advertisement
Tags :

.