रेल्वे टर्मिनससाठी 'प्रजासत्ताक दिनी' नितेश तेलींचे लाक्षणिक उपोषण
न्हावेली /वार्ताहर
भूमिपूजन होऊन नऊ वर्षे उलटूनही अपूर्ण असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. नितेश तेली हे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.सावंतवाडी रेल्वे स्थानक हे महाराष्ट्र–गोवा सीमेवरील महत्त्वाचे स्थानक असून सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील प्रवाशांसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. मात्र टर्मिनसचे काम अपूर्ण असल्याने अनेक प्रवासी गाड्यांना येथे थांबा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.आणखी एक प्लॅटफॉर्म उभारून सावंतवाडीतून थेट मुंबईसाठी तुतारी एक्सप्रेसप्रमाणे एक्सप्रेस गाडी सुरू करावी,तसेच पालकमंत्री,खासदार व आमदार यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे,अशी मागणी उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.