सौदीमध्ये अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केला शोक
वृत्तसंस्था/ जेद्दाह, नवी दिल्ली
सौदी अरेबियामध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. जेद्दाहमधील भारतीय मिशनने याबद्दल माहिती दिली आहे. पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ हा अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे मिशनने म्हटले आहे. याशिवाय, सौदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून मृतदेह मायदेशी पाठविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.
सौदीतील अपघाताबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील प्रदेशातील जिझानजवळ झालेल्या रस्ते अपघातात 9 भारतीय नागरिकांच्या दु:खद मृत्यूबद्दल आम्ही आमच्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो,’ असे भारतीय वाणिज्य दूतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या दुर्घटनेबाबत जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण मदत करत आहे आणि अधिकारी आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहे. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. अपघाताबाबत मृतांचे आणि जखमींचे नातेवाईक संपर्क साधू शकतील अशी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.