नवा वाहतूक आराखडा तयार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती ; कारखाने संचालनालय इमारतीची पायाभरणी
पणजी : राज्यातील आगामी नाताळ हंगामासाठी वाहतूक आराखडा तयार असून, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरु केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात पर्यटकांची गर्दी होत असते. यंदाही आतापासूनच वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. म्हणून वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पोलीस आणि वाहतूक खात्याने ‘वाहतूक व्यवस्थापन आराखडा’ तयार केला आहे. नवीन वर्षात त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षक नवीन असले तरी त्यांनी वाहतूक व्यवस्थापनाकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आल्तिनो येथे कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नवीन इमारतीची पायाभरणी मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पायाभरणी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह कारखाने आणि बाष्पक संचालनालयाचे मंत्री नीळकंठ हळर्णकर व संचालनालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सूचनांची होणार अंमलबजावणी
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोव्यात दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि वाहतूक खात्याने काही उपाय सुचवले आहेत. ते प्रत्यक्ष अंमलात येण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. पीडब्ल्यूडीने गतिरोधक उभारण्यासह रस्त्यांवर बॅरिकेड्स घालण्याचे काम सुरू केले आहे. राज्यात प्रत्येक दिवशी लहान- मोठे अपघात होत आहेत. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने वाहतूक आणि पीडब्ल्यूडी खात्याला उपाययोजना आखण्यास सांगितले आहे. पीडब्ल्यूडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत याचा आढवा घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.