नव्या तंत्रज्ञानामुळे बदलतेय युद्धाचे स्वरुप
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/वेलिंग्टन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सद्यकाळातील सुरक्षा विषयक आव्हानांवर लक्ष वेधले आहे. सद्यकाळात हायब्रिड युद्ध, सायबर हल्ले आणि भ्रामक प्रचार असे अवजार ठरले आहेत, जे राजकीय आणि सैन्य उद्देशांसाठी वापरले जात असल्याचे राजनाथ सिंह यांनी गुरुवारी म्हटले आहे. तामिळनाडूच्या वेलिंग्टनमध्ये डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजच्या दीक्षांत सोहळ्याला त्यांनी संबोधित केले. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमधून पारंपरिक युद्धाच्या पद्धती बदलल्याचे आणि त्यांची नव्याने व्याख्या तयार केली जात असल्याचे कळते. नवी तंत्रज्ञानं युद्धाचे स्वरुप बदलत आहेत. सध्याचे युग एआय आणि अनमॅन्ड सिस्टीमचे आहे. आता युद्ध जमीन, समुद्र आणि आकाशाच्या पारंपरिक क्षेत्रांच्या खूप पुढे गेले आहे. सशस्त्र दलांना विविध क्षेत्रे म्हणजेच सायबर, अंतराळा आणि माहिती क्षेत्र इत्यादींमध्ये मिळून काम करण्याची गरज आहे, असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
अनेक गंभीर आव्हाने
सध्या आम्ही अशा युगात जगत आहोत, जेथे सायबर हल्ले, भ्रामक माहिती आणि आर्थिक हल्ले स्वत:चे राजकीय आणि सैन्य उद्देश पूर्ण करण्याची अस्त्रं ठरली आहेत. तसेच त्यांच्या माध्यमातून एकही गोळी न चालवता स्वत:चे उद्देश पूर्ण करता येऊ शकतात. सद्यकाळात भारतासमोर अनेक गंभीर आव्हाने आहेत, आम्ही उत्तर आणि पश्चिमेकडील सीमेवर धोक्यांना सामोरे जात आहोत. छुपे युद्ध आणि दहशतवादामुळे ही समस्या आणखी वाढली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.