आर्थिक लुटीचे नवनवे प्रकार सुरूच
कधी अमलीपदार्थ तर कधी अडचणीत असल्याचा मेसेज : खबरदारी बाळगण्याची गरज
बेळगाव : आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमचा कुरियर आला आहे. पार्सलमध्ये एमडीएमसारखे अमलीपदार्थ आहेत, असे सांगत ठकविण्याचे प्रकार सुरूच आहेत. भामट्यांच्या धमक्यांना बळी पडून अनेक जण कंगाल होत असून गेल्या पंधरवड्यात सायबर गुन्ह्यात झपाट्याने वाढ झाली आहे. उद्योजक, राजकीय नेते, महिला अधिकाऱ्यांनाही सायबर गुन्हेगारांकडून धमकीचे फोन कॉल सुरूच आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यात तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये अमलीपदार्थ आहे, असे सांगत कारवाईची धमकी देत अनेकांची फसवणूक केली आहे. शहर व जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे यासंबंधी फशी पडलेल्यांनी तक्रारीही दाखल केल्या आहेत. पोलीस दलाच्यावतीने सातत्याने जागृती करूनही फसवणुकीचे प्रकार थांबेनात. आता अमलीपदार्थांबरोबरच आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. तुमच्या नावे दोन कोटीचे कर्ज आहे. तुम्ही कर्जाचा भरणा केला नाही म्हणून अटक करावी लागणार आहे, असे सांगत पैशांची मागणी करणारे फोन सुरू झाले आहेत. शनिवारी बेळगाव परिसरातील एका महिला अधिकाऱ्याशी संपर्क साधून सायबर गुन्हेगारांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे दिले नाहीत तर अटक करण्याची धमकीही दिली आहे.
शहर सायबर क्राईम विभागाकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली असून तातडीने आम्ही सांगतो त्या खात्यावर पैसे जमा करा, नहून तुमच्या घरी कारवाईसाठी पोलीस धाडण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी कर्ले येथील एका युवकाच्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट अकौंट उघडून त्याच्या मित्रांकडून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न झाला आहे. या युवकाच्या मित्रांना मी अडचणीत आहे. दहा हजार रुपये माझ्या खात्यात जमा करा, असे मेसेज आले. काही मित्रांनी खात्री करून घेण्यासाठी त्या युवकाशी संपर्क साधल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. दहा हजार नाही तर किमान चार हजार तरी फोन पे करा, असे मेसेज सुरू होते. रक्कम जमा करण्यासाठी जो क्रमांक देण्यात आला होता, त्या क्रमांकावर संपर्क साधला असता बंद असल्याचे दिसून आले. केवळ पैसे जमा करून घेण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. यापूर्वी पोलीस व इतर शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या नावे फेसबुकवर बनावट अकौंट काढून त्यांच्या मित्रांकडे पैसे मागण्याचे प्रकार चालत होते. आता इन्स्टाग्रामवरूनही हे प्रकार सुरू झाले आहेत. यासंबंधी सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला असता अशा प्रकारांना बळी पडू नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगावी. तरच फसवणूक होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.