विश्वचषकासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राष्ट्रीय निवड समिती अमेरिकेतील आगामी टी-20 विश्वचषकासाठी आयपीएलमधील कोणत्याही धडाकेबाज कामगिरी केलेल्या खेळाडूची निवड करण्याची शक्यता कमी असली, तरी या महिन्याच्या अखेरीस संघ निश्चित झाल्यावर यापूर्वी खेळविण्यात आलेल्या काही खेळाडूंवर निराश होण्याचा प्रसंग येऊ शकतो. ‘आयसीसी’ने 1 मेपर्यंत तात्पुरत्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करणे अनिवार्य केल्यामुळे निवड समितीवरील अजित आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांपुढे काही पर्याय स्पष्टपणे राहिले आहेत. कोणतेही प्रयोग किंवा धक्कादायक निवड होणार नाही. जे भारतातर्फे खेळले आहेत आणि ज्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत तसेच आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे त्यांना संधी मिळेल, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी एकाला स्पर्धेस मुकावे लागण्याची शक्यता आहे. परंतु अंतिम 15 खेळाडूंमध्ये या दोघांचीही निवड झाल्यास कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंग आणि चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबे या दोन फिनिशरपैकी फक्त एकालाच होकार मिळेल.
दुसरा बाबी यष्टिरक्षकाची आहे, जिथे संजू सॅमसन, जितेश शर्मा, के. एल. राहुल आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा आहे. राहुल आणि किशन आघाडीला येऊन फलंदाजी करतात आणि त्यांनी या आयपीएलमध्ये आतापर्यंत मधल्या फळीत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे निवड समितीला त्यांनी क्रमवारीत खाली येऊन फलंदाजी केल्यास त्यांचा प्रभाव कसा पडतो याचे विश्लेषण करणे कठीण होईल. हार्दिक पंड्याची तंदुऊस्ती हा चिंतेचा विषय असला, तरी त्याच्या निवडीबाबत कोणतीही शंका नाही. त्याच्याप्रमाणेच विराट कोहलीचाही समावेश स्वाभाविक आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांचीही निवड जवळजवळ पक्की आहे.