भारतासोबत मजबुतीने उभा नेपाळ : ओली
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी संवेदना व्यक्त
वृत्तसंस्था/ काठमांडू
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पूर्ण जगाला धक्का बसला आहे. या भ्याड हल्ल्याप्रकरणी शेजारी देश नेपाळने देखील दु:ख व्यक्त केले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पीडितांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. नेपाळ भारतासोबत मजबुतीने उभा आहे. दहशतवादाच्या कुठल्याही रुपाची आणि त्यांच्या कृत्यांची आम्ही कठोर निंदा करतो. हल्ल्यात नेपाळचा एक नागरिक मृत्युमुखी पडला असून आम्ही या हल्ल्यातील पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहोत असे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी म्हटले आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी भारत-नेपाळच्या सोनैली सीमेवरील सतर्कता वाढविली आहे. या क्षेत्रात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी लोकांना सीमा पार करण्याची अनुमती देण्यापूर्वी त्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी करण्याचा निर्देश संबंधितांना दिला आहे.
भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि देशविरोधी घटकांची घुसखोरी रोखण्यासाठी एसएसबीने नेपाळला जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर क्लोज सर्किट कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे तैनात केल्याची माहिती महराजगंजचे पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीणा यांनी दिली आहे.