For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला भीषण पूर; 16जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह 384 पर्यटक बेपत्ता

05:42 PM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला भीषण पूर  16जणांचा मृत्यू  105 भारतीयांसह 384 पर्यटक बेपत्ता
Advertisement

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. उपलब्ध ताज्या माहितीनुसार, किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 400पर्यटक आणि यात्रेकरू संपर्काबाहेर आहेत. बचाव आणि शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

Advertisement

रसुवातील टिमुरे आणि रसुवागढी परिसराला पुराचा मोठा फटका बसला. पुराच्या जोरदार प्रवाहात वाहने, पूल, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा वाहून गेल्या. चीनच्या तिबेट सीमेकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाचेही मोठे नुकसान झाले आहे. बेट्रावती ते रसुवागढी या सुमारे 42 किलोमीटरच्या मार्गाचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

384पर्यटक संपर्काबाहेर

Advertisement

नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार, 384 पर्यटक आणि प्रवासी संपर्काबाहेर आहेत. यामध्ये 291 विदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. विदेशी नागरिकांमध्ये 105 भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही यात समावेश आहे. ही आकडेवारी प्राथमिक असून संबंधित ट्रॅव्हल एजन्सी, मार्गदर्शक, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने त्याची पडताळणी सुरू आहे.

कैलास-मानसरोवर यात्रेसाठी तिबेटकडे जाणाऱ्या यात्रेकरूंचा मोठा समूहही या भागात होता. एका ट्रॅव्हल कंपनीच्या माहितीनुसार सुमारे 390 यात्रेकरू सीमेकडे जाणार होते आणि त्यापैकी अनेकांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

बचावकार्याला वेग

नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर साधनांचा वापर केला जात आहे. जखमींसाठी वैद्यकीय केंद्रे उभारण्यात आली असून प्रभावित भागात बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

पुरामुळे अनेक जलविद्युत प्रकल्पांनाही फटका बसला आहे. रस्ते, पूल, वीज प्रकल्प आणि सीमा व्यापाराशी संबंधित पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अलर्ट

नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर भारतातील सीमावर्ती राज्यांमध्येही सतर्कता वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर येथे गंडक आणि नारायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिहारमध्येही संभाव्य पूरस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, भारत-नेपाळ सीमेवर एसएसबीकडून बचाव आणि मदत पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोसी आणि नारायणी नदीच्या खोऱ्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Advertisement
Tags :

.