नीट-युजी परीक्षार्थी सर्वोच्च न्यायालयात
दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश देण्याची मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नीट-युजी उत्तीर्ण झालेल्या गुजरातमधील 56 उमेदवारांनी गुऊवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. नीट-युजी परीक्षेच्या पेपरफुटीशी संबंधित विद्यार्थी आणि इतरांची चौकशी करून त्यांची ओळख पटवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला निर्देश द्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. याशिवाय दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे. सिद्धार्थ कोमल सिंगला याच्यासह इतर 55 विद्यार्थ्यांनी वकील देवेंद्र सिंग यांच्यामार्फत नवीन याचिका दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) परीक्षा रद्द करण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये अनेक उमेदवार पहिल्या क्रमांकावर आहेत. या विद्यार्थ्यांनी याचिका सादर करून आपल्या स्वतंत्र मागण्या सादर केल्या आहेत. नीट-युजी परीक्षेतील गोंधळाबाबत आतापर्यंत विविध न्यायालयांमध्ये अनेक याचिका दाखल केल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयातही वेगळ्या याचिका आहेत. या परीक्षेशी संबंधित सर्व 26 याचिकांवरील सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ करणार आहे.
नीट-युजी परीक्षा ‘एनटीए’द्वारे देशभरातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशासाठी घेतली जाते. यंदा ही परीक्षा 5 मे रोजी 4,750 केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला सुमारे 24 लाख उमेदवार बसले होते. मात्र, पेपरफुटीसह अनेक गैरप्रकारांच्या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू आहेत. यासोबतच राजकीय पातळीवरही विरोधक केंद्रातील एनडीए सरकारवर हल्लाबोल करत आहेत.