पाकिस्तानला धडा देण्याची आवश्यकता - डॉ. फारुख अब्दुल्ला
वृत्तसंस्था / श्रीनगर
पाकिस्तानवर आता केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन भागणार नाही, तर त्याला जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरच्या जनतेच्या विरोधात आहेत. त्यांना निष्प्रभ करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाकिस्तानलाच धडा शिकवावयास हवा. दोन्ही देशांमध्ये पूर्ण युद्ध झाले तरी त्याला आमची सज्जता आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सिंधू पाणी करारावरही त्यांनी टिप्पणी केली. या कराराची पुनर्मांडणी झाली पाहिजे, अशी आमच्या पक्षाची अनेक दशकांपासूनची मागणी आहे. सध्या जो करार आहे, त्याचे समर्थन आम्ही केलेले नाही. आम्हाला विश्वासात न घेतला 1960 मध्ये त्यावेळच्या नेतृत्वाने हा करार केला. आता भारताने हा करार स्थगित केला असून आता त्याची पुनर्मांडणी करण्याची संधी आहे. आम्ही पाकिस्तानी लोकांना मरु देणार नाही. मात्र, सिंधू नदीच्या पाण्यावर आमचा अधिकार निर्विवाद आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी केले.