For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्याला व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्याची गरज

10:14 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्याला व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्याची गरज
Advertisement

कुणीतरी युवावर्गाला वाचवा हो, असे म्हणण्याची वेळ : पोलिसांचा गैरव्यवहारांना आश्रय, किशोरवयीन पिढी वाया जाण्याचा धोका

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील किशोरवयीन तसेच युवावर्ग जुगार, सट्टाबाजार, मटका यासह इतर व्यसनांच्या आहारी गेल्याने तालुक्यातील किशोरवयीन तसेच युवक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. किशोरवयीन मुलांना कुणीतरी वाचवा हो, असे म्हणण्याची वेळ हतबल पालकांवर आली आहे. या सर्व गैरव्यवहारांना पोलिसांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट होत असून पालक आणि नागरिकांतून पोलिसांच्या या नाकर्तेपणाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरासह तालुक्यात गांज्यासह इतर अंमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी किशोरवयीन मुले गेल्याने अनेक गैरप्रकार घडत आहेत. आपल्या व्यसनांची तलप भागवण्यासाठी ही किशोरवयीन मुले लहान, मोठ्या चोऱ्या करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी निडगल, भंडरगाळी भागात शहरातील अल्पवयीन मुले चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरताना नागरिकांच्या हाती सापडली. त्यांना चोप दिल्यानंतर गांज्याची तलप भागविण्यासाठी चोरी करत असल्याचे कबूल केले आहे. यापूर्वीही अशा अनेक प्रकारच्या चोऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आणि नागरिकांनी जागरुक होणे गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण किशोरवयीन मुले आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जावून उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत तातडीने कठोर भूमिका घेऊन पोलिसांना सूचना करण्याची मागणीही होत आहे.

शहराभोवती जुगारी अड्ड्यांचे जाळे

Advertisement

शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अवैद्ध धंद्यांना ऊत आला असून याला पोलिसांचा वरदहस्त लाभल्याचे दिसून येत आहे. खानापूर शहराच्या 5 कि. मी. परिसरात क्लबच्या नावाने जुगारी अड्डे खुलेआम सुरू आहेत. यात शहरासह तालुक्यातील अनेक युवक जुगार खेळत आहेत. त्यामुळे अनेक युवकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या क्लबमध्ये जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांना वाहनांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी जेवण, दारुसह इतर व्यसनांचीही पूर्तता करण्यात येत आहे. तसेच जुगारात हरल्यास जुगार खेळण्यासाठी व्याजाने रक्कमही पुरवण्यात येत असल्याचे समजते.

युवकांना 20 टक्के व्याजाने पैसे देण्याचे जाळे

ही रक्कम मोठ्या व्याजाने देण्यात येत असून व्याजाने दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी नाना प्रकार अवलंबिले जात आहेत. त्यामुळे जुगारात हरलेली आणि व्याजानी उचल केलेली रक्कम परतफेड न करता आल्याने अनेकांनी गाव सोडून पलायनही केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच शहरासह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्याजाने रक्कम देण्याची सावकारी धंदा वाढत आहे. त्यामुळे दहा टक्के ते वीस टक्के व्याजाने कर्ज देणाऱ्यांचे जाळे पसरले आहे.सावकारी व्याजात अनेकांनी दिवाळे काढल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

व्याजाने दिलेले पैसे वसुलीसाठी तगादा

व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. तसेच धमक्याही देण्यात येत आहेत. पैसे वसुलीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात असल्याने वसुलीच्या भीतीने अनेकांनी गाव सोडून पलायन केलेले आहेत. खानापूरसह तालुक्यात अवैद्य धंद्यांना ऊत आला असून याकडे पोलिसांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची कायदा व सुव्यवस्था पार कोलमडली आहे. यासाठी पोलिसांनी गाव पातळीपासून शहरात कठोर क्रम घेणे गरजेची असल्याची भावना सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.