बेळगुंदी-शिनोळीला जोडणाऱ्या पुलाच्या दुरुस्तीची गरज
पुलावर संरक्षक कठडा नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय : पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने मोठी समस्या
वार्ताहर /किणये
बेळगुंदी-शिनोळी दोन्ही गावांच्या सीमेवर असणाऱ्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बेळगुंदी गावच्या शेतशिवाराच्या शेवटच्या हद्दीवर मार्कंडेय नदीवर हे पूल गेल्या बऱ्याच वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. या पुलावरून दोन्ही भागातील शेतकरी वर्ग ये-जा करीत असतात. मात्र सदर पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच पुलावर संरक्षण कठडा नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बेळगुंदी भागातील शेतकरी व शिनोळी भागातील शेतकरी या पुलावरून ये-जा करण्यासाठी संपर्क रस्ता म्हणून उपयोग करतात. शेत शिवारातून गेलेल्या या रस्त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होत आहे. कारण मुख्य रस्त्यावरून येण्यापेक्षा अवघ्या काही अंतरावरच मिळवून बेळगुंदीहून शिनोळीला जाणे व शिनोळीहून बेळगुंदीला येणे सोयीस्कर ठरते आहे. शेतशिवारातून बेळगुंदी भागातील बरेचसे शेतकरी या पुलापर्यंत रोज आपल्या शेतशिवाराला ये-जा करीत असतात. पावसाळ्यात मात्र नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर पूल पाण्याखाली जातो. त्यानंतर सदर रस्ता बंद होतो. मात्र ऐन उन्हाळ्यात नागरिक दुचाकी व पायवाट म्हणून तसेच या पुलापर्यंत वाहनांमधूनही प्रवास करीत असतात. दोन्ही भागातील शेतकऱ्यांसाठी हा पूल महत्त्वाचा आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून सदर पुलावर संरक्षण कठडा बसविण्यात यावा व या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.