For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडू, बंगालमध्येही रालोआ सरकार येणार

06:07 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडू  बंगालमध्येही रालोआ सरकार येणार
Advertisement

मदुराई येथे अमित शाह यांचे वक्तव्य : पुढील वर्षी दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ मदुराई

पुढील वर्षी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत जनताच द्रमुकला पराभूत करणार आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि अण्णाद्रमुक मिळून रालोआ सरकार स्थापन करतील, पश्चिम बंगालमध्येही रालोआचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मदुराई येथील जाहीर सभेत बोलताना केला आहे.

Advertisement

भाजपचे हे संमेलन द्रमुक सरकारला सत्तेवरून हटविणे आणि परिवर्तनाच्या प्रारंभाचा संकेत आहे. तामिळनाडूची जनता आता परिवर्तन इच्छा बाळगून असून भाजप कार्यकर्ते याकरता पूर्णपणे तयार आहेत. तामिळनाडूत 2026 मध्ये भाजप-अण्णाद्रमुक आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

द्रमुक अध्यक्ष अन् मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे अमित शाह द्रमुकला हरवू शकत नसल्याचे म्हण आहेत. ते खरं बोलत आहेत, मी नव्हे तर तामिळनाडूची जनताच द्रमुकला सत्तेवरून हाकलणार असल्याचे शाह म्हणाले. शाह यांनी रविवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची समीक्षा करत राज्याच्या नेत्यांसोबत रणनीतिवर चर्चा केली आहे.

तामिळनाडूची जनता द्रमुक सरकारच्या भ्रष्टाचाराला वैतागली आहे. भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक गल्ली आणि घरापर्यंत पोहोचतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआचा विकसित अन् समृद्ध तामिळनाडूचा दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहोचवतील. केंद्र सरकारने मागील 10 वर्षांमध्ये तामिळनाडूला 6.80 लाख कोटी रुपये दिले आहेत. तरीही केंद्राने राज्यासाठी काय केले असा प्रश्न स्टॅलिन विचारत आहेत. 2021 च्या निवडणुकीत द्रमुकने दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे का असा प्रतिप्रश्न शाह यांनी स्टॅलिन यांना केला आहे. तामिळनाडूत मद्यविक्री घोटाळ्यातील रकमेद्वारे प्रत्येक शाळेत किमान 2 वर्ग निर्माण करता आले असते असा आरोप शाह यांनी केला.

तर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह यांनी तमिळ भाषेत बोलता येत नसल्याने खेद व्यक्त केला. भारताच्या महान भाषांपैकी एक तमिळमध्ये बोलू शकत नसल्याने मी पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागतो असे त्यांनी म्हटले आहे. वैद्यकीय आणि इंजिनियरिंगचे शिक्षण लवकर तमिळ भाषेत सुरू करण्यात यावे असे आवाहन मी स्टॅलिन सरकारला करत आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेत सेंगोल स्थापित करत तामिळनाडूचा सन्मान केला असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत. गृहमंत्र्यांनी दौऱ्याच्या प्रारंभी प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरात दर्शन अन् पूजा केली.

Advertisement
Tags :

.