Navratri 2025 Kolhapur: नवरात्रोत्सवात वाहतूक, वाहनतळ व्यवस्था पुरेशी करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्यविषयक सुविधा द्या
कोल्हापूर : नवरात्रोत्सव दि. 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले, भाविकांना चांगल्या पध्दतीने दर्शन घेण्यासाठी रांगांची व्यवस्था करा, स्वच्छताविषयक कामांना सुरुवात करा, सालाबादप्रमाणे ठिकठिकाणी वाहनतळ उभारुन दिशादर्शक फलक लावा, पोलीस प्रशासन आणि मंदिर समिती यांनी समन्वयातून सुरक्षाविषयक नियोजन करा, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबवा तसेच भाविकांना चांगल्या प्रकारे आरोग्यविषयक सुविधा द्या.
बैठकीला पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, पोलीस उप निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, तहसीलदार स्वप्नील रावडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, जिल्हा पर्यटन समितीचे अशासकीय सदस्य आदी उपस्थित होते.
शहरातील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाहेरील वाहनतळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांना मंदिरापर्यंत येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनतळावरून येण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसेस तसेच रिक्षा मिळतील यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
प्रत्येक वाहनतळावरून विशेष केएमटी बसेस कमी दरात भाविकांसाठी उपलब्ध होणार आहेत. मंदिर परिसरासह शहरातील सीसीटीव्हीद्वारे एआयच्या मदतीने निगराणी नवरात्रोत्सवात किती भाविकांनी भेट दिली यासह आपत्तीविषयक माहिती क्षणात कंट्रोल रूम मध्ये पोहचावी. संशयास्पद वर्तन विश्लेषण आणि रिअल-टाइम अलर्ट देण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मंदिर परिसरासह शहरातील सीसीटीव्हीद्वारे एआयच्या मदतीने निगराणी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
यात लाखो भाविकांच्या गर्दीत गुन्हे रोखणे, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्ती विषयक धोके टाळणे इत्यादी बाबी एआयचा वापर करून सानियंत्रित केल्या जाणार आहेत. शाही दसरा महोत्सवांतर्गत होणार विविध कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी नवरात्र उत्सवात विविध पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच करवीर तारा पुरस्कारही सुरु करण्यात आला आहे.
या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. दसऱ्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमावेळी विविध मिरवणुकांमध्ये ढोल, लेझीम, पारंपरिक नृत्य, कला तसेच जिह्यातील क्रीडा क्षेत्रात देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडापटूंचा सहभाग मिरवणुकीत असणार आहे. तसेच नवरात्रीत प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम यात पारंपरिक पोशाख दिवस, शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन, चित्रकला स्पर्धा, पथनाट्या, रांगोळी स्पर्धा, पारंपरिक युध्द कला, आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.